मुंबई-मुख्यमंत्री कोणाचेही फोन उचलतात असे व्हिडिओ फिरतात. तर त्यांचे वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांची कुचेष्टा करतात, अशाप्रकारचा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज सभागृहात लगावला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादा, तुम्ही काळजी करु नका. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असे म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे. अवकाळी मुद्द्यावरून विरोधक सभागृहात आक्रमक झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही शेतकऱ्यांची तातडीने मदत करू असे आश्वासन दिले आहे. अजित पवार म्हणाले, गेल्या 8 दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. फळबागांचे नुकसान झाले. आंबा, काजू यांचे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. सरकार संवेदनशील आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार पुढे म्हणाले, अवकाळीवरुन मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले होते की, शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालेले नाही. असे तारेही त्यांनी तोडले. स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघाबाबत तरी त्यांनी एवढ्या उलट्या काळजाचे व्हायला नको होते. इथे मुख्यमंत्री कोणाचेही फोन उचलतात असे व्हिडिओ फिरतात. मात्र त्यांचे वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांची अशाप्रकारे कुचेष्टा करतात. अजित पवार म्हणाले, काल गालिचा पसरावा अशाप्रकारे पिकांवर बर्फाची चादर होती. तातडीने पंचनामा व्हायला हवा. मात्र दुर्दैव म्हणजे वर्ग-3 व 4 चे कर्मचारी संपावर असल्याने तेवढ्या तत्परतेने मदत होत नाही. शेककरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे आम्हाला रोज फोन येत आहेत. आम्हाला काहीतरी मदत करा, असे त्यांचे म्हणणे आहे. अवकाळीमुळे पिकांची वाट लागली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर जात आहेत. त्यामुळे याला गांभीर्याने घ्या. कांद्याला तुटपुंजी मदत मिळाली आहे. त्यांनाही मदत करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या प्रश्नावर उत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, नांदेडच्या कलेक्टरशी मी काल रात्री बोललो. ते स्वतः हर्दापूर, मुदखेडला गेले. त्याठिकाणी पंचनामे सुरु आहेत. नाशिक कलेक्टरशी मी बोललो. त्याठिकाणचे पंचनामे करुन अहवाल पाठवण्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंतच्या पावसाचे पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. हे शेतकऱ्यांचे सरकार एकनाथ शिंदे म्हणाले, कालच्या पावसाचेही पंचनामे कलेक्टर करत आहेत. अभिजीत राऊत त्याठिकाणी आहेत. शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहिलोच आहोत. नियम-निकष डावलून मदत करत आहोत. त्यामुळे दादा तुम्ही बिलकुल काळजी करु नका. शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे