मुंबई- शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ खरा आहे की खोटा?, याचा आधी शोध घ्या. त्यानंतर तो व्हिडिओ मॉर्फ केला आहे की नाही?, याचा तपास करा, अशी खोचक मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.महिलांची बदनामी, शोषण होता कामा नये या मताचे आम्ही आहोत. महिलांबाबत सभ्यपणे शब्द वापरले पाहिजेत. सगळ्यांनीच महिलांचा सन्मान केला पाहिजे असे राऊत म्हणाले.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, व्हायरल व्हिडिओत असलेल्या पुरुष आमदाराचे काय म्हणणे आहे?, हेही एकदा जाणून घ्यायला हवे. याबाबत आतापर्यंत त्यांनी काहीच तक्रार केलेली नाही. त्यांची याबाबत काहीच तक्रार नाहीये का? अशा व्हिडिओंमुळे केवळ महिलांचीच बदनामी होते का? पुरुषांची बदनामी होत नाही का?, असा टोला संजय राऊतांनी प्रकाश सुर्वेंना लगावला.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओवरुन ठाकरे समर्थक मानल्या जाणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, संपूर्ण देशभरात ती चित्रफीत व्हायरल झाली आहे. लाखो लोकांनी ती चित्रफीत बघितली आहे. मग काय लाखो, कोट्यवधी लोकांना अटक करणार आहात का? तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे. त्यावर एसआयटी स्थापन करावा, अशा अनेक गोष्टी सध्या राज्यात घडत आहेत. मात्र, काही गोष्टी केवळ राजकारण आणि सुडापोटी केल्या जात आहेत, अशी टोला संजय राऊतांनी लगावला.
दरम्यान, ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, शिंदे गट पूर्वी बाप पळवत होता, आता मुलेही पळवायला लागले आहेत. मुळात भूषण देसाई यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. ते सक्रिय राजकारणात नव्हते. शिंदे गटाची ही मेगाभरती कुचकामी आहे.
संजय राऊत म्हणाले, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच भूषण देसाईंवर जमीन घोटाळ्याचे आरोप केले होते. त्या आरोपांचे आता काय झाले? भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांनाही आता धुवून काढले आहे का? भाजप सध्या वॉशिंग मशीनमध्ये इतका कचरा टाकत आहे की, ही वॉशिंग मशीनच खराब होईल.
राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तसेच, नाशिकपासून शेतकऱ्यांचा लाँग मार्चही मुंबईच्या दिशेने निघाला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावा करतात की, जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर आहे. तसे असते तर आज जनता रस्त्यावर उतरली नसती. जनता सरकारच्या विरोधात आहे. महाराष्ट्र खदखदत
आहे.
राजकीय विरोधकांनी संपवण्याचा डाव
देशाच्या संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर राजकीय विरोधकांनी संपवण्याचा डाव सुरु आहे. त्याच्याविरोधात राहुल गांधी बोलले. देशात रोज लोकशाहीची हत्या होत आहे. याबाबत राहुल गांधी बरोबर बोलल्याचे राऊत म्हणाले.