राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर ईडीकडून शोध मोहीम राबवली जात आहे. साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी हा तपास केला जात असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे समजते आहे.कोल्हापूर आणि पुण्यातील मुश्रीफांचे निवासस्थान आणि कार्यालयांत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडण्याची ही पहिलीच वेळ नसून या आधीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी धाड टाकून त्यांची चौकशीही केली होती.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. 2020 साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, तरी सुद्धा या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.