कोल्हापुर-विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचे विधानभवनातही तीव्र पडसाद उमटले.संजय राऊत म्हणाले, आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, अशी टीका त्यांनी केली.
संजय राऊत म्हणाले, शिवगर्जना संकल्पना घेऊन महाराष्ट्रात राज्याच्या सर्वच भागात शिवसेनेचे नेते, उपनेते, प्रमुख अधिकारी संपर्क करत आहेत. मूळ पक्ष आमच्यासोबत आहे. विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही हे काल कोर्टानेही म्हटले आहे. हा पक्ष इथे आहे. आमच्या गर्जनेपेक्षा लोकांची गर्जना ऐकायला जातोय. ही गर्जना काय आहे हे काल धाराशिवला पाहिले असेल.
संजय राऊत म्हणाले, धाराशिवला बच्चू कडूंना लोकांनी जाब विचारला. चोर डाकूंसोबत का गेला? अशी गर्जना केली. कोल्हापुरात आम्हाला आमच्या बाजूने वातावरण आहे. शिवसेनेतील फुटीच्या घटनेनंतर आधी होती त्यापेक्षा ही संघटना मजबूत होऊन विस्तारत होत आहे. लोकांमध्ये उत्साह दिसत आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, आम्हाला अटक केली. सिसोदियांना अटक केली. आमच्या पदाधिकाऱ्यांनाही अटक केलीय. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली एका चोराने, किरीट सोमय्याने कोट्यवधी रुपये गोळा केले. हे कोट्यवधी रुपये राजभवनात जमा करू असे सोमय्या म्हणाले. अशा 28 चोरांना ईओडब्ल्यूच्या माध्यमातून क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवण्यात आला.संजय राऊत पुढे म्हणाले, आमच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पण लक्षात ठेवा 2024 ला त्याचा हिशोब केला जाईल. विक्रांत घोटाळा कधी थांबणार नाही. दडपला जाणार नाही. या घोटाळ्याची चौकशी का थांबवली, जनतेचा पैसा कुठे गेला यासाठी मी स्वत: कोर्टात याचिका दाखल करणार आहे. कोट्यावधी रुपये सोमय्याने कुठे दडपवले हे सांगावे.