मुंबई- जे नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले आहेत त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमसाठी बंद असतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले आहेत. शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.पक्ष सोडून गेलेल्यांना आता पक्षात जागा नाही. तसेच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७० ते ८० जागा मिळणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशा सूचना पवारांनी दिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार गटाची बैठक पार पडली. बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष, खासदार सुप्रीया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.
लोकसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे जिल्ह्यात पक्षबांधणीला सुरुवात करा. आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आपल्यालाच काम करायचं आहे. आपणच पक्ष पुढे घेऊन जायचा आहे, अशा सूचना शरद पवार यांनी बैठकीमध्ये दिल्या आहेत. त्यामुळे फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.
भारतीय जनता सद्या विचित्र प्रकारचे राजकारण करत आहे. कारण नसताना इंडिया आणि भारत असा वाद सुरू केला आहे. कारण नसताना सत्ताधाऱ्यांकडून लोकांचं मन विचलित करण्याचं कामं सुरू आहे. समाजातील महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून आपल्याला हवं तसं वातावरण निर्माण करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे, असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
निवडणुकीसाठी कामाला लागा
शरद पवार हे मुंबईत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कारण नसताना हवं तसे वातावरण निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करु लागले आहेत. परंतु याकडे आपल्याला दुर्लक्ष करावे लागेल. लोकांमध्ये जाऊन सांगावे लागेल. येणाऱ्या निवडणूकीत महाविकास आघाडी म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरायचे आहे. सर्वांनी कामाला लागा. जे वेगळी भूमिका घेऊन बाहेर पडले आहेत. त्यांच्यासाठी आता राष्ट्रवादी पक्षात स्थान नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी बंडखोर आमदार तथा नेत्यांना केला.
G20 परिषदेत प्रदर्शन, मोदींवर घणाघात
शरद पवार म्हणाले की, इंडिया किंवा भारत या विषयात घटनेच्या पहिल्या वाक्यात यासंबंधीचे स्पष्टीकरण केलेले आहे. तरी देखील सत्ताधारी अशा प्रकारचे राजकारण करत आहेत. आज दिल्लीत विविध देशांचे प्रमुख आलेले आहेत. त्यांचे स्वागत करणे हे आपल्या देशाचे कर्तव्य आहे, ते आम्हाला मान्यच आहे. मात्र, त्यांच्यासाठी चांदीचे ताट, सोन्याचे ताट असे कधी झाले नाही. परंतू ज्या पद्धतीने त्यांचे प्रदर्शन केले जात आहे. त्यातून येणाऱ्या 2024 च्या निवडणूकीसाठी कसा फायदा होईल. असाच विचार दिसून येतो, असे म्हणत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला.
मग गेट वे ऑफ इंडियाला काय म्हणणार
शरद पवार कार्यकर्त्यांना बोलताना म्हणाले की, इंडिया या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती योजना काढल्या आहेत? तेव्हा हे का सूचले नाही. केवळ राजकारण व मुळ विषयाकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे षडयंत्र आहे. किती ठिकाणी केंद्रसरकार बदल करणार आहे. आता गेट वे ऑफ इंडिया? ला काय म्हणणार, असा सवाल देखील उपस्थित केला.