मुंबई-सर्वसामान्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकविण्यासाठी ही आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा आहे. या यात्रेमुळे या सर्वसामान्यांना ताकद मिळून त्यांची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी केले. मतपेटीतून सत्तेसाठी सर्व तत्वहीन तडजोडी करणारे खोके आमदार जन्माला येणे हे लोकशाहीसाठी धोक्याचे आहे !. खोकेवाल्या सरकारमुळे महाराष्ट्र कलंकित झाले अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा क्षेत्रातील सभेत राचुरे यांनी केली. आम आदमी पक्षाची पंढरपूर ते रायगड ही स्वराज्य यात्रा ठाणे येथे पोहचली त्यावेळी ते बोलत होते.
दि. २८ मे रोजी पंढरपूरहून निघालेली ही स्वराज्य यात्रा गेले ९ दिवस प्रवास करून ठाणे येथे ४ जून रोजी पोहचली. शहराच्या मुख्य बाजारपेठेतून निघालेली ही यात्रा इंदिरानगर नाका येथे सभेमध्ये रुपांतरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. आजच्या घडीला सगळ्यात मोठा प्रश्न हा संविधान आणि लोकशाही वाचविण्याचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षण आणि आरोग्यासाठी लागणाऱ्या भरमसाठ खर्चामुळे गरीबांना या सुविधा मिळू शकत नाहीत. यावर आम आदमी पार्टीने यशस्वी पर्याय शोधला असून आज दिल्लीतील सरकारी शाळेत आमदारांची मुले सर्वसामान्य मुलांसोबत शिकत आहेत. आज दिल्लीत उत्तम अशा आरोग्याची सोय सर्वसामान्यांनाही उपलब्ध आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये उभे राहिलेले हे मॉडेल आपल्याला महाराष्ट्रातही उभे करायचे आहे. यासाठी पक्षाचे विचार समाजाच्या तळागाळात पोचविण्याची ही यात्रा असल्याचे आप नेते रंगा राचुरे यांनी यावेळी सांगितले.
गेले ९ दिवस ही यात्रा पंढरपूर, सोलापूर,बारामती, सांगली , कोल्हापूर,सातारा, पुणे, पिंपरी चिंचवड, पनवेल, नवी मुंबई असा प्रवास करत ठाणे येथे पोहचली. पुढे पनवेल व महाड येथे स्वराज्य यात्रा सोमवारी पोहचली.
या सर्व यात्रेत कार्यकर्त्यांच्या उदंड सहभाग होता. प्रत्येक गावात शिरताना नागरिक उत्स्फर्तपणे प्रतिसाद देत होते. आम आदमी पार्टी महाराष्ट्रात यायलाच हवी, निवडणुकीत आम्ही निश्चितपणे पाठिंबा देवू अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करीत होते.
यावेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सह प्रभारी गोपाल इटालिया, यात्रेसोबत असणारे पक्षाचे पदाधिकारी डॉ फैजी, धनंजय शिंदे, देवेंद्र वानखेडे, मुकुंद किर्दत, संदीप देसाई, अन्सार शेख, किशोर मंध्यान, स्थानिक नेते पचौरी यासह राज्याच्या विविध क्षेत्रातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेसाठी ठाणेकरानी मोठी गर्दी केली होती.