अहमदनगर- अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार, अशी घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अहमदनगरमधील चौंडी येथे आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयेजित कार्यक्रमात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले. आता अहमदनगरचे आहिल्यानगर करणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात हे नामांतर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर समाजासाठी आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. विखे – पाटील यांच्या नेतृत्वात 10 हजार कोटींचा फंड तयार केला. एकाही पैशाचे व्याज न घेता मेढपाळांना कर्ज देण्याचा आम्ही निर्णय घेतला. आजपर्यंत मेढपाळांना पावसाळ्यात चरायसाठी जमीन ठरवून द्या ही गेल्या 25 वर्षांची मागणी आपण पूर्ण केली आहे. मेढपाळाकरता चरायराण राखून ठेवण्याचे काम या सरकारने केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर वाड्यांना जोडण्यासाठी आपण अर्थसंकल्पात रस्त्याची तरतूद केली आहे. 22 वेगवेगळ्या योजनाचा लाभ आपण आपल्या समाजाला उपलब्ध करुन दिला आहे. धनगर समाजासाठी 1 हजार कोटींच्या कामाची सुरूवात झाली होती. मात्र, सरकार बदलले आणि एक रुपयाही मिळाला नाही. आमचे सरकार आले नी पुन्हा सर्व मागण्यासाठी निधी दिला.
अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर करावे अशी मागणी चौंडीतील कार्यकमात बोलताना भाजप आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धाराशिव केले छत्रपती संभाजीनगर केले मग आमच्या नावात बदल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर समाजासाठी दरवर्षी 25 हजार घरे बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. वाडी वस्तीवर राहणारा एकही धनगर बेघर राहणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच नामांतर होणार आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिंदेंनी दिली. ते चौंडी येथे एका सभेला संबोधित बोलत होते. त्यामुळे आगामी काळात हा जिल्हा ‘अहिल्यानगर’ म्हणून ओळखला जाईल, असे शिंदेंनी स्पष्ट केले.