महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी तातडीने दिले स्पष्टीकरण .वाचा काय म्हटलेय त्यांनी …
नाशिक-महाराष्ट्रात सदनात जयंती साजरी करायला विरोध नाही. परंतु याठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे. ती झाकून सावरकर यांचा पुतळा लावला गेला. तिथेच छोट्या चौकात दोन पुतळे आहेत. त्यात राजमाता अहिल्याबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केले गेले. ही घटना मनाला दुःख देणारी आहे, या प्रकरणी आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली.
दरम्यान दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सदनात आयोजित विविध शासकीय कार्यक्रम, समारंभावेळी आवश्यकतेनुसार सदनातील पुतळ्यांची जागा त्या समारंभाच्या वेळेपुरती बदलण्यात येते. अशी जागा बदलताना सर्व महनीय व्यक्तींचा सन्मान ठेवला जाईल, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यानुसार या महनीय व्यक्तींचा योग्य तो सन्मान राखूनच रविवारी आयोजित कार्यक्रमावेळी सदर पुतळ्यांची तात्पुरती रचना केली होती. त्यामुळे या कार्यक्रमात महनीय व्यक्तींचा अनादर केला, असे वृत्त वस्तुस्थितीला धरुन नाही.
नाशिक येथील कार्यालयात भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनात मोठ्या हॉलची व्यवस्था असताना कार्यक्रम तिथे का घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे व हा मूर्खपणा कुणी केला त्याच्यावर कारवाई करावी. पुतळे हटविण्याचे काम का केले, जाणीवपूर्वक हे केले का हे शोधावे, असे आवाहन त्यांनी केले.नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले की, या सोहळ्याबद्दल अतिशय वाईट वाटले. पहिल्या संसद भवनाच्या वेळी स्वातंत्र्याचे लढव्यये होते. आता मात्र उघड बंब माणसे होती. त्यांच्या मध्येच पंतप्रधान मोदी उभे होते. या सोहळ्यावर पवार साहेब म्हणाले ते खरे आहे. या धर्मकांडामध्ये सहभागी झालो नाही याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.देशात लोकशाही व्यवस्था आहे, राजव्यवस्था नाही. लोकशाहीत जनता राजा आहे. आता मात्र लोकतंत्र आहे की मनुतंत्र आहे ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत मोदींनी जे केले ते मनाला वेदना देणारे असल्याचे भुजबळ यांनी म्हटले. असा सोहळा राम मंदिर, शिव मंदिरात ठीक होता, पण हे लोकशाहीच्या मंदिरात अपेक्षित नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या निवडीबद्दल ते म्हणाले की, काही लोकांकडून गैरसमज पसरवला जात आहे. एकीकडे पुण्यात शेळकेंना जबबादारी दिली म्हणून अजित पवार यांना बाजूला केले का ? असा सवाल करत नवीन लोकांवर जबाबदारी दिली जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील निवडणूक घेण्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही निवडणुकीला तयार आहोत. कुठलाही राजकीय पक्ष कायम तयार असतोच. कर्नाटक मध्ये जे पानीपत झाले ते पाहता ते एकत्रित निवडणुकांचे पाऊल उचलतील असे वाटत नाही.छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकची बँक सर्वात मोठी होती तर देशातील दुसऱ्या नंबरची बँक होती. दिवसाढवळ्या बँक काही लोकांनी लुटली. या बँकेवर प्रशासक येण्यासाठी मी प्रयत्न केला. बँक पूर्व पदावर यायला आणखी वेळ लागेल. आज शेतकऱ्यांना खासगी बँकांकडे जावे लागते आहे. स्वाहाकारी नेत्यांनी बँकेची वाट लावली. याबाबत जनतेने आवाज उठविला पाहिजे. बँक पूर्वीसारखी होत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ नये असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवी दिल्ली, दि. 29: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील नवीन महाराष्ट्र सदनात समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या काही छायाचित्रांमध्ये महनीय व्यक्तींचे पुतळे दिसत नसल्याने, ‘महनीय व्यक्तींचा अनादर’ अशा मथळ्याखाली काही प्रसारमाध्यमांद्वारे वृत्त प्रसारित केले जात आहे.
याबाबत महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी वस्तुस्थिती नमूद केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सदनात आयोजित विविध शासकीय कार्यक्रम, समारंभावेळी आवश्यकतेनुसार सदनातील पुतळ्यांची जागा त्या समारंभाच्या वेळेपुरती बदलण्यात येते. अशी जागा बदलताना सर्व महनीय व्यक्तींचा सन्मान ठेवला जाईल, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यानुसार या महनीय व्यक्तींचा योग्य तो सन्मान राखूनच रविवारी आयोजित कार्यक्रमावेळी सदर पुतळ्यांची तात्पुरती रचना केली होती. त्यामुळे या कार्यक्रमात महनीय व्यक्तींचा अनादर केला, असे वृत्त वस्तुस्थितीला धरुन नाही.