मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव होता. त्यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारल्यानंतरच त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
मी भाजपचा प्रस्ताव स्वीकारला असता तर महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्षांपूर्वीच कोसळले असते, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. यावर भाष्य करताना आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, अनिल देशमुख यांनी काही आमदारांसह भाजपमध्ये यावे, असा प्रस्ताव होता. त्यासाठी देशमुखांवर दबाव टाकण्यात आला. देशमुख यांनी हा प्रस्ताव नाकारल्यामुळेच त्यांना नंतर तुरुंगात टाकण्यात आले.
संजय राऊत म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव टाकला, याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. यााबतचे व्हिडिओ क्लिपही माझ्याकडे आहे. हे सर्व पुरावे अनिल देशमुखांनी स्वत: शरद पवारांनाही दाखवले होते. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच जयंत पाटील यांच्यावरही भाजप प्रवेशासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांनी तो नाकारताच त्यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यावर अशा प्रकारचा दबाव टाकला जात आहे.
केजरीवाल आज उद्धव ठाकरेंना भेटणार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या मुंबईत आहेत. केजरीवाल आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर सकाळी 11 वाजता भेट घेणार आहेत, अशी मााहिती संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत म्हणाले, सनदी अधिकार्यांच्या नियुक्त्या व बदल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सर्व अधिकार दिल्ली सरकारला दिले होते. मात्र, केंद्र सरकारने एका अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच रद्द केला. राज्यसभेत या अध्यादेशाला विरोधक मंजूर होऊ देणार नाही. राज्यसभेत या अध्यादेशाला नामंजूर कसे करायचे, याबाबत सर्व विरोधक चर्चा करणार.
लोकसभेच्या 19 जागांवर ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यावर टोला लगावताना शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे की, या 19 पैकी 13 जणांनी आत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या कोणत्या 19 जागा आहेत? याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे सर्वच्या सर्व 13 खासदार पडतील. त्या सर्वांचा आम्ही पराभव करू व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या जागांवर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार निवडून येतील.