‘देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. सामान्य माणूसच हुकूमशहाचा पराभव करू शकतो हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला.
त्याबद्दल त्या शहाण्या जनतेचे अभिनंदन,’ अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. २०२४ सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन,’ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.