मुंबई- तथाकथित हनुमानाला प्रचारात उतरवले होते, मात्र बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली. कर्नाटकचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा आहे. देशाच्या मन की बात कर्नाटकातून समोर आली, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कलांमध्ये काँग्रेस 118, भाजप 75 आणि जेडीएस 25 जागांवर आघाडीवर आहे. अपक्षांच्या खात्यात 6 जागा जाताना दिसत आहे. या निकालावरुन संजय राऊत यांनी कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव मोदी आणि शहांनी मान्य करावा असा घणाघात केला आहे.
संजय राऊत म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळत आहे. मोदी, शहा यांनी आता हा पराभव स्वीकारायला हवा. महाराष्ट्रातून काही लोक प्रचाराला गेले होते. मात्र ज्या ज्या ठिकाणी हे लोक गेले त्याठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे. कर्नाटकचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा आहे. देशाच्या मन की बात कर्नाटकात समोर आली.
संजय राऊत पुढे म्हणाले, भाजपच्या दबावाला कर्नाटकची जनता बळी पडली नाही. याठिकाणी कोणतीच स्टोरी चालली नाही फक्त लोकशाहीची स्टोरी चालली नाही. हनुमानाला प्रचारात उतरवले होते मात्र बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली. काहींनी येथे खोके उतरवले मात्र खोके सरकारला कर्नाटकी जनतेने उलथवून लावले. याठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आपल्याच लोकांना पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पैशांचा महापूर ओतला, असा आरोप राऊतांनी केला आहे.
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील कारवाई शिंदे-फडणवीस सरकारने थांबवली आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, बीजेपीचे वॉशिंग मशिन आहे. त्यामुळे परमबिर सिंग यांना क्लिन चीट दिली आहे. भाजप चोर लफंग्यांना समर्थन देते मग ते राजकारणातले असो की प्रशासनातले असो.