मुंबई- उद्धव ठाकरे आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या वर आहेत. आता ते कुणाला व्हीप बजावू शकतात? शिवसेना म्हणून ते व्हीप बजावू शकतात का? शिवसेना आम्ही आहोत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला तर त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाने शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब केले आहे असा दावा केला आहे.
सुप्रीम कोर्टाने आमच्या सरकारला घटनात्मक ठरवले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. तर आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असेल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.दरम्यान विधीमंडळातील पक्ष कोणता हे देखील अध्यक्ष राहुल नार्वेकर ठरवतील, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर शिंदे-फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत न्यायालयाच्या निकालावर आपले मत व्यक्त केल आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे. त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. निश्चितपणे हा लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्ण विजय झाला आहे. हा जो काही निकाल आहे, यातील 4 ते 5 मुद्द्यांकडे मी आपले लक्ष वेधणार आहे. महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर कोर्टाने पाणी फिरवले आहे. ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने अतिशय स्पष्टपणे अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील. कोर्टाने या आमदारांचे सर्व अधिकार कायम ठेवलेले आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ठाकरे गटाने उपस्थित केलेले प्रश्नचिन्हावर कोर्टाने निवडणूक आयोगाला सर्व अधिकार असल्याचे सांगितले आहे 16 आमदार अपात्र झाले तर सरकार सांगितले आहे. राजकीय पक्ष कोणता आहे हे विधानसभा अध्यक्ष ठरवतील, आणि मग ते अपात्रतेची कारवाई करतील असे कोर्टाने म्हटले आहे. आता हे सरकार पूर्णपणे कायदेशीर आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणाले की मी नैतिकतेच्या अधिकारावर राजीनामा दिला. पण मग भाजपसोबत निवडणूक लढवली आणि मविआसोबत गेलात तेव्हा तुम्ही नैतिकता कोणत्या डब्यात बांधून ठेवली होती? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी नैतिकतेची गोष्ट सांगू नये कारण त्यांनी खूर्चीसाठी विचार सोडला. तर एकनाथ शिंदे यांनी खूर्ची सोडून विरोधकांसोबत आले. उद्धव ठाकरेंनी हराण्याच्या लाजे पोटी आणि भिती पोटी राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे काही कारण नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार कायदेशीर आहे, यावर कोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे.
सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली आहे. हे जनतेचे सरकार आहे यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे, अशाप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे.
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार आहेत.
एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, आज सत्याचा विजय झाला. कायदेशीर बाबी आणि तांत्रिक बाबी देवेंद्रजींनी सांगितल्या आहेत. देशात संविधान आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येणार नाही. सरकार कायदेशीर बाबींची पूर्तता करुन सरकार स्थापन केले. अनेक लोक बेकायदेशीर म्हणत होते. त्यांना कोर्टाने चपराक दिली आहे. कालबाह्य केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेतील. निवडणुक आयोगाने धनुष्यबाण दिला. आम्ही बहुमताचा निर्णय घेतल्यानंतर निवडणुक आयोगाने निर्णय दिला. त्यांच्याकडे बहुमत नव्हते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही जनभावनेचा आदर केला. शिवसेना-भाजप सोबत लढले दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले. बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचे काम आम्ही केले. बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टाने केलाय.