मुंबई-एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. तेच मुख्यमंत्री राहतील. पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच होईल. आमचे सरकार स्थिर आहे, असा दावा बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आताच अंदाज वर्तवणे शक्य नाही. मात्र, आपण आशावादी असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या या साऱ्या कृतीला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. आता या प्रकरणाचा निकाल उद्या सुनावला जाणार आहे. तसे संकेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिलेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. शिवाय साऱ्या देशाचे या निकालाकडे लक्ष आहे.
देवेंद्र फडणवीस याबद्दल म्हणाले की, आम्ही आशावादी आहोत. कारण आमची केस मजबूत आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. अर्थात निकाल येईपर्यंत आपण थांबले पाहिजे. त्याकरिता खूप त्याच्यावर स्पेक्युलिकेशन करणे योग्य नाही. सुप्रीम कोर्ट हे अॅपेक्स कोर्ट आहे. त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. त्याच्यावर कुठलाही अंदाज व्यक्त करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देतील, अशी चर्चा असल्याचे फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, माफ करा, पण शब्द वापरतो. हा मुर्खांचा बाजार आहे. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकणार नाही. एकनाथ शिंदे कशाकरिता राजीनामा देतील, काय कारण आहे, काय चूक केलीय त्यांनी. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आणि मी दाव्याने सांगतो की, पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच होणार. सरकार एकदम स्थिर असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.