मुंबई-
रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या बारसूच्या आंदोलनात बाहेरचे लोक आले आहे, मात्र कुणावरही लाठीचार्ज झालाच नाही असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. ते माध्यमांशी बोलत होते.राजकारणासाठी राजकारण करू नका, अहंकारामुळे त्यांनी (उद्धव ठाकरेंनी) अनेक प्रकल्प बंद केले असा टोलाही CM शिंदेंचा ठाकरेंना लगावला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी स्वतः उद्योगमंत्र्यांशी बोललो. जिल्हाधिकारी, पोेलिस अधिक्षकांशी चर्चा केली. आता तेथील परिस्थिती शांत आहे. काही लोक जे आले त्यानंतर पोेलिस व त्यांच्यात चर्चा झाली. कुठलाही लाठीचार्ज झालेला नाही. शेवटी त्यांच्या संमतीने कुठलाही प्रकल्प पुढे न्यायाचा आहे. शेतकऱ्यांचा पाठींबा आहे पण काही स्थानिक होती पण काही लोक बाहेरची लोक तिथे आली होती. परंतु कुठल्याही स्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय करून जोरजबरदस्तीने कुठलीही प्रक्रीया होणार नाही. अशी सरकारची भूमिका आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, प्रकल्प त्या भागातील लोकांना रोजगार देणारा आहे. म्हणून सत्तर टक्के लोक प्रकल्पाच्या बाजूने आहेत. त्यामुळे कलेक्टर, एसपी आणि संबंधित अधिकाऱ्यांना मी प्रकल्पाचे फायदे समजून सांगा अशा सूचना केल्या आहेत. नक्कीच ते समजावून सांगतील. त्यांच्या सभा घेतल्या जातील आणि त्यांच्या संमतीनेच या प्रकल्प पुढे नेला जाईल अशी आमची भूमिका आहे. उद्योगमंत्री जातीने लक्ष ठेवून आहेत. शेतकरी, गावकऱ्यांनी शांत राहावे असे आवाहन मी करतो. त्यांच्यावर कुठलीही जबरदस्ती होणार नाही.एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाबाबत असा आधी प्रकार झाला होता. लोकांना प्रकल्पाचा फायदा आणि विकास समजला. स्थानिकांनाच रोजगार मिळणार, व्यापार होणार. फायदा होणार.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हा प्रकल्प तेथे करावा असे म्हटले होते. त्यावेळी तुमची संमती होती पण आता पद गेले तर विरोध आहे, असा विरोधाला विरोध त्यांनी करायला नको. कुठलाही लाठीचार्ज झालेला नाही. हेअरिंगमध्येही सत्तर टक्के लोक प्रकल्पाच्या बाजूने होते अशी माहितीही प्रशासनाकडून मला देण्यात आली आहे. उद्योग परराज्यात जातात असा आरोप होतो. मग आपल्याकडे जर उद्योग आले तर राजकीय भांडवल केले जाते.
एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी पक्षाला राजकारण करण्यापलीकडे सुचत नाही. अडीच वर्षे राज्याचा कारभार ठप्प होता. सर्व प्रकल्प आम्ही पुढे नेत आहोत. अहंकारामुळे प्रकल्प अडवले होते. ते आम्ही पुढे नेत आहोत. चर्चेने खासदार, आमदारांचे आणि लोकप्रतिनीधींच्या शंकाही चर्चेद्वारे दुर करायला हव्या.