मुंबई-रत्नागिरीतील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प घाईत करू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांनी चर्चा करूनच पुढे जावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. या भेटीबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सांगितले की, माझी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्य केली आहे. त्यानुसार उद्या बारसू प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलक आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीत अधिकारी प्रकल्पाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना समजावून सांगणार आहेत. त्यातून सर्वांना मान्य असा तोडगा निघाला तर चांगलेच आहे. अन्यथा इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागेल.
शरद पवार म्हणाले, बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी जमिनीची केवळ चाचपणी सुरू आहे. कुणाचीही जमिन अजून ताब्यात घेतली नाही, अशी माहिती मला उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच, याबाबत आम्ही लोकांची समजूत घातल्यावर त्यांचा आता विरोध नाही, असेही सामंतानी मला सांगितले. त्यावर प्रकल्प करण्याबाबत घाईघाईने कोणतीही भूमिका घेऊ नका, अशी सूचना आपण उदय सामंतांना केली आहे.शरद पवार म्हणाले, उद्या बारसू येथे प्रकल्पाच्या स्थळीच आंदोलक आणि अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. त्यातून काय निष्कर्ष ते बघूया. चर्चेतून काही प्रश्न समोर आले तर ते सोडवण्यासाठी राज्य सरकराने प्रयत्न केले पाहीजेत किंवा इतर पर्यायांचा शोध घेतला पाहीजे. एखादा प्रकल्प राज्यासाठी महत्त्वाचा असला तरी स्थानिकांना विश्वासात घेऊनच सरकारने प्रकल्प राबवला पाहीजे. विशेषत: कोकणात एखादा नवा प्रकल्प गेला तर तेथे स्थानिकांच्या भावना तीव्र असतात, याची नोंद सरकारने घेतली पाहीजे. त्यामुळे प्रकल्पाबाबत स्थानिकांचे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.
दरम्यान, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत ठाकरे गट असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. तर, कोकणातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी व खासदार विनायक राऊत यांनी मात्र बारसू रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला आहे. यावर शरद पवार म्हणाले, याबाबत राजन साळवी आणि विनायक राऊत यांच्याशी बोलावे लागेल. त्यानंतरच त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे समजेल.