रत्नागिरी-बारसू रिफायनरी प्रोजेक्टला सुरू असलेला विरोध शिंदे सरकारला बळाचा वापर करून मोडीत काढायचा आहे. मात्र, घाबरून जाऊ नका. शिवसेना तुमच्यासोबत आहे. वेळ पडली, तर मुंबईतली अख्खी शिवसेना बारसूमध्ये उतरवू, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे खासदार विनायक राऊत यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाने बारसू प्रकल्पाविरोधात उघडपणे दंड थोपटलेत.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सरकार गडगडणार, असल्याचा दावाही विनायक राऊत यांनी केला. मात्र, बारसूविरोधातल्या भूमिकेमुळे ठाकरे गट पुन्हा आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सरकार गडगडणार आहे. त्यामुळे यापूर्वी शेवटचा हात धूवुन घ्यावा यासाठी मिंधे सरकार बारसू येथे येणाऱ्या कंपनीकडून लाच घेऊन हा प्रकल्प राबवत आहे. असा आरोपही विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी येथे प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.विनायक राऊत म्हणाले, बारसू येथे होणाऱ्या मोर्चात आम्ही सहभागी होऊ. फडणवीस कर्नाटकातून अकलेचे तारे तोडत आहेत. त्यांना म्हणाव तेच हेलिकॉप्टर घेऊन येथे या. हा प्रकल्प राज्यसरकारचा आहे कि रत्नागिरीच्या एसपींचा आहे? जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यावर एसपी उत्तर देत होते. कर्तव्याचे पालन करताना राजकारणाचा बळी होऊ नका, असे म्हणत विनायक राऊतांनी रत्नागिरीच्या पोलिस आयुक्तांना टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, बारसू प्रकल्पाबाबत ठाकरे गटाची भूमिका अजिबात दुटप्पी नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. कोकणवासीय आता प्रकल्प आमच्यासाठी घातक आहे, असे म्हणत असतील तर ठाकरेंची शिवसेना त्यांच्यासोबत आहे. या प्रकल्पासाठी पहिली गोळी आम्ही झेलू. पुढे संजय राऊत म्हणाले, पर्यावरणासाठी घातक असलेले प्रकल्प कोकणात आणण्याऐवजी टाटा एअरबस, फॉक्सकॉन, ड्रग्ज पार्क असे स्वच्छ प्रकल्प उद्योगमंत्री राज्यात का आणत नाहीत? हे प्रकल्प राज्याबाहेर का गेले?, यावर उद्योगमंत्र्यांनी तोंड उघडावे.