गुजरातेत दंगलीला सत्ताधारी जबाबदार–निकालाने कायदा, संविधानाचीही हत्या
मुंबई-गुजरातमध्ये अल्पसंख्यांकांची हत्या झाली. ती राजकीय दंगल होती. यामागे तेव्हाचा सत्ताधारी पक्ष जबाबदार होता. त्यात खासदार, आमदार, मंत्र्यांना अटक झाली. जामिन मिळाला. एवढे दिवस केस चालली. पण सर्व लोक निर्दोष झाले. म्हणजे त्यावेळी ज्या लोकांची हत्या झाली ती कशाने झाली? मृत्यूमुखी पडलेल्यांची हत्याच झाली; पण कायदा आणि संविधानाचीही हत्याच झाली. त्याचासुद्धा मर्डर झाला हे कालच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते घाटकोपर (पूर्व ) येथील राखी जाधव यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याला संबोधित करीत होते.
शरद पवार म्हणाले, गुजरातमध्ये अल्पसंख्यांकांची हत्या झाली. हल्ले झाले काही लोक मृत्यूमुखी पडले. ही राजकीय दंगल झाली. यामागे तेव्हाचे सत्ताधारी पक्ष जबाबदार होते. त्यात ज्यांना अटक झाली त्यामध्ये महिला, खासदार, आमदार, मंत्री होते. एवढे दिवस केस चालली. या लोकांना अटक झाली आणि लगेचच जामिनही दिला गेला व त्यानंतर काल हायकोर्टाचा निर्णय आला की, हे सर्व लोक निर्दोष आहेत. म्हणजे त्यावेळी ज्या लोकांची हत्या झाली ती कशाने झाली?
शरद पवार म्हणाले, जर हल्लाच केला नाही तर हत्या होईलच कशी? हत्या झाल्यानंतरही हे निर्दोष म्हणून सोडले जातात. एका दृष्टीने जे मृत्यूमुखी पडले, त्यांची तर हत्याच झाली; पण कायदा आणि संविधानाचीही हत्याच झाली. त्याचासुद्धा मर्डर झाला हे कालच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. हे सर्व आज ज्यांच्या सत्ता हातात आहे, त्या सत्तेचा वापर ज्या पद्धतीने ते करीत आहेत त्यातून हे झाले.
शरद पवार म्हणाले, आज अनेक प्रश्न आहेत, महागाईचे संकट आहे. हजारोंच्या संख्येने लोक शोधत आहेत पण नोकरी मिळत नाही. या देशाचा अन्नदाता उद्धवस्त होत आहे. अन्नधान्य, फळं नुकसानीमुळे रस्त्यावर फेकावा लागला. या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची गरज आहे.
जेलमध्ये टाकण्याची सरकारची निती–विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना तेरा महिने तुरुंगात ठेवले पण आता अहवाल आला की, सव्वा कोटींचा भ्रष्ट्राचार झाला आधी शंभर कोटींचा घोटाळा झाला असे म्हटले गेले होते. एक कोटी रुपये अनिल देशमुखांनी शिक्षण संस्थेला देणगी दिली तर त्यांना तेरा महिने शिक्षा याचा अर्थ काय तर लोकशाहीला आज कुणी भुमिका घेवून पुढे येत असेल पण ती आमच्या सुसंगत नसेल तर त्यांना जेलमध्ये टाकू ही आत्ताच्या सरकारची निती आहे.
शरद पवार म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील केसवर अर्थ नाही पण त्यांनाही तुरुंगात ठेवले गेले. भाजपचे आणि आज आमचे नेते असलेले एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक करण्यात आली. त्यांच्या जावयाची केस सव्वादोन वर्षांपासून दाबुन ठेवली ती कोर्टात नेली जात नाही अशी स्थिती होती. ही सर्व उदाहरणे म्हणजे सत्तेचा गैरवापर करणे होय. हा देश, राज्य आम्ही म्हणेल तशाच पद्धतीने चालावा अशी त्यांची भूमिका आहे.
शरद पवार म्हणाले, जातीयवाद वाढवला जात आहे. धर्म, जात वेगळी आणि विषयांची सुसंगत नसलेल्यांची गळचेपी होत आहे. या काळात जागे राहावे लागले. काहीही किंमत द्यावी लागली तरी त्यांच्या बाजूने जायचे नाही. अन्याय, अत्याचार ज्यांच्यावर झाला त्यांच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे.