मुंबई-विधान परिषद निवडणुकीत 20 तारखेला चमत्कार घडेल, असा दावा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार यावेळी निवडून येतील. कोटा कसा जास्त राहू शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, हे सांगताना शिवसेनेच्या सहयोगी अपक्षांना आम्ही फोन केले अशी कबुली त्यांनी यावेळी दिली.
होय, आम्ही कॉल केला
अजित पवार म्हणाले, शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येण्यास काहीच समस्या नाही. कारण त्यांचे मतदार आणि काही अपक्षांचा शिवसेनेला पाठिंबा आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. मविआची एकजूट आहे. काही जणांकडे मतदार कमी पडत असल्याने नेत्यांकडून अपक्षांना फोन करण्यात आले. मात्र शिवसेनेच्या सहयोगी आमदारांनी मुख्यमंत्री जे सांगतिले तसे करू, असे सांगितल्याचेही ते म्हणाले.
आमदारांना मार्गदर्शन करणार
अजित पवार म्हणाले, राज्यसभेवेळी आमची मते बाद ठरवण्यात आली. मात्र, विधान परिषदेच्या वेळी आम्ही निवडणुकीत मत बाद होणार नाही यासाठी प्रयत्न करू. साधारण 30 कोटा केला तरी शिवसेनेचे 2 उमेदवार निवडून येतात. तर राष्ट्रवादीचे दोन मतदारांना मतदान करण्याची परवानगी नाही. यामुळे अपक्षांच्या मदतीने आम्ही दुसरा उमेदवार निवडून आणू. अपक्ष आमदारांना योग्य आदर देत त्यांचे मत पदरात पाडून घ्यावे लागते, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.
पवार बैठकीला मार्गदर्शन करणार
अजित पवार म्हणाले की, आज संध्याकाळी आमच्या आमदारांची बैठक आहे. या बैठकीला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. मला अजून कोणत्याही सूचना आल्या नाही. कुणीही दबाव आणल्याचे अजून सांगितले नाही. यावेळी आमदार निवडून देत असताना आपल्याकडे व्यवस्थित कोटा आहे. मागच्यावेळी आमचे उमेदवार निवडून देऊन कमी मते उरत होती. त्यामुळे आम्ही एकत्र बैठक घेतली होती. मात्र, आता शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येतील असे चित्र आहे.