मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला. उद्या सकाळी 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यात 35-65 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचेही सुत्रांनी सांगितले. याचबरोबरच 10 ऑगस्टपासून विधीमंडळाचे अधिवेशन असल्याने सचिवालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची उद्याची मोहर्रमची सुटी रद्द करण्यात आली आहे.
कार्यालयीन आदेश जारी
विधीमंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चालु आणि नियोजीत रजाही नऊ ते अठरा ऑगस्ट या कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात कार्यालयीन आदेशच काढण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. राजभवनावर नव्या मंत्र्यांना शपथ देण्याची तयारीही जोरात सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासोबतच कॅबिनेट विस्तार देखील होणार आहे. सूत्रांचे असे म्हणणे आहे की, मंत्रिमंडळाबाबत सर्व काही ठरले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही तासांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. आज रात्री शपथविधी होऊ शकतो का? या बद्दलही चाचपणी सुरू आहे.
35-65 चा फॉर्मुला
दहा ते 15 मंत्र्यांचा शपथविधी उद्या होऊ शकतो. त्यानंतर पुढच्या टप्प्यात इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडू शकतो. राज्यात सत्तांतर होऊन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मात्र, आता त्याचा मुहूर्त ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तार 35-65 चा फॉर्मुला ठरला असून, यात भाजप, शिंदे गट आणि इतर छोटे पक्षांतील मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार आहे.
छोटेखानी विस्तार होणार?
राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबरोबरच खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्यामुळे राज्यात तूर्तास छोटेखानी विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातील प्रलंबित सुनावणीमुळे हा सावध पवित्रा घेतल्याची चर्चा रंगलीय. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून कोणाला संधी?
भाजपकडून पहिल्या टप्प्यात ज्येष्ठांना संधी देण्यात येत आहे. त्याच चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, रविंद्र चव्हाण यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. याशिवाय नितेश राणे यांना देखील नव्याने संधी मिळू शकते.
शिंदे गटातून कोणाला संधी?
एकनाथ शिंदे गटाकडून जे महाविकास आघाडीत असताना जे नऊ मंत्री होते. त्यांना शपथविधी देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा होता. मात्र, ताज्या मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटातून सहा किंवा सात मंत्र्यांनाच शपथविधी दिला जाऊ शकतो.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मंत्रिमंडळ झाल्यानंतर 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देखील विधिमंडळात आज अधिकाऱ्यांची तातडीच बैठक बोलावण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय संघर्षाची संपूर्ण घटना जाणून घ्या…
- 20 जून रोजी शिवसेनेचे 15 आमदार 10 अपक्षांसह सुरत आणि नंतर गुवाहाटीला रवाना झाले.
- 23 जून रोजी शिंदे यांनी दावा केला होता की त्यांना शिवसेनेच्या 35 आमदारांचा पाठिंबा आहे. पत्र जारी केले.
- 25 जून रोजी उपसभापतींनी 16 बंडखोर आमदारांना सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस पाठवली होती. बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
- 26 जून रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना, केंद्र, महाराष्ट्र पोलीस आणि उपसभापतींना नोटीस पाठवली होती. बंडखोर आमदारांना दिलासा न्यायालयाकडून मिळाला.
- 28 जून रोजी राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली होती.
- 29 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्टला स्थगिती देण्यास नकार दिल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
- 30 जून रोजी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
- 3 जुलै रोजी विधानसभेच्या नवीन सभापतींनी शिंदे गटाला सभागृहात मान्यता दिली. दुसऱ्या दिवशी शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.
- 3 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटले – आम्ही सुनावणी 10 दिवस पुढे ढकलली आहे का, तुम्ही (शिंदे) सरकार स्थापन केले आहे का?