शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सोमवारी संध्याकाळी मातोश्रीवर बैठक पार पडल्याची माहिती दिली आहे. सोबतच कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असेल तर ती निव्वळ पोटदुखी समजावी असा टोला लगावला आहे. सरकार मजबूत आहे, चिंता नसावी असंही ते म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सरकार करोनामुळे निर्माण झालेलं संकट हाताळण्यात अयशस्वी ठरलं असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. याचदरम्यान राज्यातील अनेक नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपा नेते नारायण राणेदेखील भेटीला पोहोचले होते.
संजय राऊत आणि शरद पवार यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलेलं असून नारायण राणे यांनी मात्र सरकार करोना संकट रोखण्यात अपयशी ठरलं असून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
राज्यपालांच्या भेटीसाठी नेत्यांची रांग लागल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कोणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी”.संजय राऊत यांनी याआधी केंद्र सरकार आणि भाजपा राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पण त्यांना यश मिळणार नाही असंही ते म्हणाले आहेत. नारायण राणे यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “राणे कोण आहेत ? असा निर्णय घेण्याची मागणी करण्याचा कोणता अधिकार त्यांच्याकडे आहे ? राजभवनातून निमंत्रण आल्याने मी राज्यपालांना भेटायला गेलो होतो. चर्चेदरम्यान राज्यपालांनी राज्य सरकारला करोनाची स्थिती हाताळणं कठीण जात असल्याचा उल्लेख केला. पण मी त्यांना परिस्थिती नियंत्रणात असून मुख्यमंत्री सर्वात पुढे राहून लढा देत आहेत. प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात आहेत असं सांगितलं”.