मुंबई: राज्यात सत्ता स्थापन्यासाठी शिवसेनेबरोबर मंत्रिमंडळाबाबतची कोणतीही चर्चा अद्याप सुरू झालेली नसताना आणि शिवसेनेने चर्चेची दारे बंद केलेली असतानाही भाजपने मात्र नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम ५ नोव्हेंबरसाठी बुक केले आहे. बीसीसीआयच्या परवानगीनेच शपथविधी सोहळ्यासाठी हे स्टेडियम बुक करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुंबई पोलीस आणि अधिकाऱ्यांनी आज वानखेडे स्टेडियमवर जाऊन पाहणी केली. याआधी नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदान निवडण्यात आलं होतं. मात्र मुंबई पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळ्या घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. सत्तेच्या फॉर्म्युल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुमजाव केल्यानंतर त्यादिवशी होणारी शिवसेना-भाजपची सत्ता स्थापन करण्याबाबतची बैठक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ५०-५० फॉर्म्युल्याच्या मुद्द्यावरून तसूभरही मागे हटणार नसल्याचं जाहीर करत मुख्यमंत्र्यांवर पहिल्यांदाच जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्याच दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने शिवसेना-राष्ट्रवादी सत्ता स्थापन्यासाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचं एक शिष्टमंडळ आज दिल्लीत दाखल झालं असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतील घडामोडींकडंही सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असतानाच भाजपने मात्र शिवसेनेशी चर्चा करण्यााधीच शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम बुक केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.