मुंबई- ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणून आता त्यांनी मला घरीच बसवलं होतं असं सांगत थोडे दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले ते मी दाखवेन…त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन असे गर्भित इशारे आज राष्ट्रवादीत प्रवेश करतानाच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिले.
भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर खडसे यांनी सडकून टीका केली. गेले चार वर्षे मी अन्याय सहन केला. माझ्यावरील अन्याय दूर होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. आता तर पक्षात येऊन चार दिवस झाले नाहीत तेसुद्धा मला सल्ले देऊ लागले होते. केवळ ज्येष्ठ म्हणत राहिले आणि मला अडगळीत टाकले गेले, अशी मनातील सलच खडसे यांनी बोलून दाखवली. राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याबद्दल शरद पवार व जयंत पाटील यांचे आभार मानताना मला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिल्लीतील काही भाजप नेत्यांनीच दिला होता, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला. भाजपात तुम्हाला यापुढे काही भवितव्य नाही, असे मला या नेत्यांनी सांगितल्याचा दावाही खडसे यांनी केला. माझ्या आयुष्यातील चार वर्षे वाया गेली. कदाचित राष्ट्रवादीत प्रवेश मिळाला नसता तर कायमचा घरीच बसलो असतो, असेही खडसे म्हणाले. भाजप सोडण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र कार्यकर्त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून माझ्याकडे तसा आग्रह धरला होता. कार्यकर्त्यांच्या इच्छेपोटीच आज मी राष्ट्रवादीत जात आहे. राष्ट्रवादीत जात असताना कोणत्याही पदाची मी अपेक्षा केलेली नाही. ज्या निष्ठेने भाजपात काम केले त्याच निष्ठेने मी राष्ट्रवादीत काम करणार आहे. पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेणार आहे, असा विश्वास खडसे यांनी पवारांना दिला. मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे कारवाया करत रहायचं हे मी कधी केलं नाही ”४० वर्षे पक्षात राहिल्यानं पक्ष सोडावा असं कधी वाटलं नाही. माझी छळवणूक झाली सर्वांनी पाहिली. मी वारंवार त्याबाबत विचारत होतो. सभागृहात सांगा, भ्रष्टाचार झाला, तर कागदपत्रं द्या, बऱ्याच वेळा विचारलं पण त्याचं उत्तर आतापर्यंत मला मिळालं नाही. मी खूप संघर्ष केला. भाजपामध्ये आणि मंत्रिमंडळातही संघर्ष केला. संघर्ष माझ्या पाचवीला पूजलेला,” असं खडसे पक्षप्रवेशावेळी म्हणाले.
“संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की माझा किती छळ झाला, अन्याय झाला. मी विधानसभेतही विचारलं की माझा गुन्हा काय? जर माझा काही गुन्हा असेल तर त्याचे कागदपत्र दाखवा असंही म्हटलं. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाला ६ खासदारकीच्या जागा यायच्या. येथे मी सातत्याने ५ जागा जिंकून आणल्या. ४० वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही,” असा टोला खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
“ज्यावेळी मी राष्ट्रवादी प्रवेश करण्यासंदर्भात पक्षातील नेत्यांशी चर्चा करत होतो. तेव्हा एकदा जयंत पाटील यांच्यासोबत एकदा बोलत होतो. तेव्हा जयंत पाटील मला म्हणाले की, ‘तुम्हाला राष्ट्रवादी यायचं आहे. पण त्यांनी तुमच्यामागे ईडी लावली तर काय?’ जयंत पाटलांना मी म्हणालो त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन,” असं सांगत खडसे यांनी गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला.
‘माझ्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. अँटी करप्शन विभागाची चौकशी लावण्यात आली. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मला छळलं गेलं. आता थोडे दिवस जाऊ द्या. खरं काय ते मी तुम्हाला सांगेन. कुणी किती भूखंड घेतले ते मी दाखवेन. नियमाच्या बाहेर जाऊन जर कुणी काही केले असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, असे माझे मत असून तशी मागणी मी आता सरकारकडे करणार आहे’, असे नमूद करत आधीच्या सरकारच्या काळातील भूखंड घोटाळे बाहेर काढण्याचे स्पष्ट संकेतच एकनाथ खडसे यांनी दिले.
मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत- शरद पवार
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना मंत्रिमंडळात जागा देण्यात येईल, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. यावर आता स्वतः शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, ‘खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर मंत्रिमंडळात कोणताही बदल केला जाणार नाही. सगळेजणं आहे त्या ठिकाणी आहेत आणि राहतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. यासोबतच, अजित पवारांच्या अनुपस्तितीवरुन ते नाराज नसल्याचेही पवारांनी सांगितले. कोरोना संकटामुळे काळजी घ्यावी लागते, त्यामुळे ते घरी आहेत, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले,”गेल्या काही दिवसांपासून माध्यमं खडसे यांच्या प्रवेशाच्या बातम्या चालवत होते. आज काही तरी वेगळंच. मध्येच काहीतरी जाहीर करून टाकलं की, अजितदादा नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत. असं आहे की, करोनाच्या संकटात प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. काळजी घेण्याच्या सूचना मी प्रत्येकाला दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड व्हेटिंलेटरवर होते. राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना करोना झाला. त्यामुळे काळजी घेत आहोत. खबरदारी म्हणून काही सहकारी दिसले नाही म्हणून लगेच काहीतरी गडबड झाली. काहीही गडबड झालेली नाही.
“इतिहासाचा दुसरा टप्पा सुरू झालाय”“खान्देश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरुंच्या विचाराचा होता. मध्यंतरी त्याला उतरती कळा लागली. या काळात नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचं काम नाथाभाऊंनी केलं. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगर परिषद, पंचायत समित्या आणल्या. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते जेव्हा शब्द देतात, तेव्हा तो पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे. आता करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून, नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देणार आहोत,” असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.