नितीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री-तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री ;उद्या होऊ शकेल शपथविधी
पाटना-बिहारमध्ये राजकीय घडामोडी वेग आला आहे. संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीशकुमार यांनी भाजपासोबत काडीमोड करून आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीमाना दिला आहे. नितीशकुमार यांच्या या निर्णयामुळे येथे नवे सत्तासमीकरण जुळून येण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द नितीशकुमार यांनी दिले आहेत. नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) तसेच अन्य मित्रपक्षांसोबत महागठबंधन करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी राज्यपालांना 7 पक्षांच्या 164 आमदारांचे समर्थन पत्र दिले आहे. राज्यपाल सरकार स्थापनेसाठी केव्हा निमंत्रित करतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. यानंतर तेजस्वी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तेजस्वी म्हणाले- भाजपला युतीचा कोणी साथीदार नाही, इतिहास सांगतो की, भाजप ज्या पक्षांशी युती करतो त्यांचा नाश करतो. पंजाब आणि महाराष्ट्रात काय झाले ते आपण पाहिले आहे.
पहिल्यांदाच 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी दुपारी 4 वाजता राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. त्यावेळी नितीश यांनी नवे सरकार स्थापन करण्यासाठी 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर केले होते. त्यानंतर ते राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचले, जिथे त्यांची महाआघाडीचे नेते म्हणून निवड करण्यात आली. येथे जीतन राम मांझी यांचा पक्ष HAM देखील नितीश यांच्यासोबत आला. त्यांचे 4 आमदार आहेत. यानंतर नितीश आणि तेजस्वी पुन्हा एकदा राजभवनात गेले आणि राज्यपालांना भेटले.
भाजपच्या कोअर ग्रुपने तातडीची बैठक बोलावली
सरकार स्थापनेचा दावा मांडल्यानंतर महाआघाडीचे नेते संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊ शकतात. बिहारमधील राजकीय संकट पाहता भाजपने मंगळवारी संध्याकाळीच कोअर ग्रुपची तातडीची बैठक बोलावली आहे. याला उपस्थित राहण्यासाठी सुशील मोदी, रविशंकर प्रसाद आणि शाहनवाज हुसेन मंगळवारी संध्याकाळी पाटणा येथे पोहोचले. येथील राजकीय घडामोडींबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
भाजप-जेडीयूची 21 महिने जुनी युती तुटली
नितीश यांच्या या निर्णयानंतर भाजप आणि जेडीयूची 2020 मध्ये झालेली युती तुटली आहे. राजीनामा सादर केल्यानंतर नितीश यांनी राजभवनात सांगितले की, एनडीएसोबतची युती तोडण्यासाठी पक्षाचे आमदार आणि खासदारांचे एकमत आहे.
नितीश हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील – काँग्रेस
नितीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील, असे काँग्रेस आमदार शकील अहमद खान यांनी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. काँग्रेसला सभापतीपद मिळू शकते.
तेजस्वी यादव म्हणाले, प्रादेशिक पक्षांना आम्ही संपवण्याची भाषा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली होती. भाजपला फक्त धमकावणं आणि लोकांना विकत घेणं माहितीए. आम्हाला भाजपचा अजेंडा बिहारमध्ये कदापी लागू होऊ द्यायचा नाहीए. आपल्या सर्वांना माहितीए की लालुजींनी अडवाणींचा रथ रोखला होता. आपण भाजपबाबत सौम्य धोरण कदापी घेता कामा नये. आज सर्व पक्षांनी आणि बिहार विधानसभेच्या भाजपच्या सोडून सर्व सदस्यांनी नितीशकुमार यांना आपला नेता मानलं आहे.आमच्या पूर्वजांचा वारसा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आता हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये भाजपचा एकही मित्रपक्ष राहिलेला नाही. इतिहास हेच सांगतो की, भाजपशी युती केलेल्या पक्षाला ते संपल्याशिवाय राहत नाही. हे आपण पंजाब आणि महाराष्ट्रात पाहिलंच आहे, असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलंय.
- नितीश राजभवनातून थेट राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा तेजस्वी यादव त्यांना घेण्यासाठी बाहेर आले. राबरी यांच्या घरी राजद, काँग्रेस आणि एमएलचे आमदार उपस्थित होते.
- भाजपने पाटण्यात तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीत सर्व मंत्री आणि संघटनेच्या नेत्यांना बोलावण्यात आले आहे.
भाजप कोट्यातील मंत्र्यांना बडतर्फ केले जाईल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश मंत्रिमंडळात समाविष्ट भाजप कोट्यातील मंत्र्यांची हकालपट्टी होऊ शकते. मुख्यमंत्री यासंदर्भात राज्यपालांना पत्र देऊ शकतात. नितीश मंत्रिमंडळात सध्या 2 उपमुख्यमंत्र्यांसह भाजप कोट्यातील 16 मंत्री आहेत.
फ्लोअर टेस्टसाठी तयारी
युती तुटल्यानंतर नितीश कुमारही आता फ्लोर टेस्टची तयारी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आमदारांना पुढील 72 तास पाटण्यात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिहार विधानसभेत जेडीयूचे ४५ आमदार आहेत.
काय म्हणाले बिहारामधील राजकीय नेते
जीतनराम मांझी, माजी मुख्यमंत्री – बिहारमध्ये समीकरण काहीही असो, आम्ही नितीशकुमार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
भक्तचरण दास, काँग्रेस प्रभारी – भाजपविरोधात नितीश कुमार यांच्यासोबत जाण्यास तयार आहोत. तेजस्वी यादव जो काही निर्णय घेतील त्याचे आम्ही समर्थन करू.
नीरजसिंह, जेडीयू– आमच्या नेत्याविरोधात षडयंत्र रचले गेले आहे. त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न झाला. लवकरच सर्व काही सांगेन.
आरजेडी-एमएलच्या 14 आमदारांच्या सदस्यत्वावर संकट
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत झालेला प्रचंड गदारोळ आणि विरोधी आमदारांनी सभापती विजयकुमार सिन्हा यांच्याशी केलेली गैरवर्तणूक या मुद्द्यावरून विधानसभेच्या आचार समितीच्या शिफारशीच्या आधारे १४ आमदारांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये या प्रश्नावरही निर्णय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खरे तर, आचार समितीच्या शिफारशीवर अद्याप सभापतींच्या पातळीवर विचार सुरू आहे. त्या अहवालात काय कारवाईची शिफारस करण्यात आली आहे, हे सभागृहात मांडल्यानंतरच कळेल. पण सूत्रांवर विश्वास ठेवला तर, आरोपी 14 आमदारांचे सदस्यत्व गमावण्याचा धोका कायम आहे.