नवी दिल्ली – सुमारे 22 तासांच्या हो-नाही, हो-नाही नंतर अखेर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजीनामा आला. रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 12.10 वाजता सिंधिया यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यावरून राजीनामा देण्याचे पत्र ट्विट केले. मात्र हा राजीनामा 9 मार्च रोजी लिहिला होता. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांनंतर काँग्रेसने सिंधिया यांना पक्षातून काढून टाकण्याचे आदेश जारी केले. याच्या 5 मिनिटानंतर 12.35 वाजता सिंधिया समर्थक 14 आमदारांनी आपला राजीनामा विधानसभेला ईमेल केला. हे सर्व आमदार सोमवारपासून बंगळुरुत थांबले आहेत. आणखी काही आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.
राजीनाम्यात लिहिले – मी काँग्रेसमध्ये काम करू शकणार नाही
सिंधिया यांनी राजीनाम्यात लिहिले की,
“डिअर मिसेस गांधी, मी गेल्या 18 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य आहे. आता मी नव्याने सुरुवात करून पुढे जाण्याची वेळ आली आहे. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तुम्हाला माहिती आहेच, मागच्या वर्षीच हा मार्ग सुरू झाला. तथापि, माझे जनसेवेचे उद्दीष्ट पूर्वीपासून नेहमीसारखेच राहिले आहे, मी माझे राज्य आणि देशातील लोकांची त्याचप्रकारे सेवा करत राहीन. मला वाटते की हे काम या पक्षात (काँग्रेस) राहून यापुढे करू शकणार नाही. माझ्या लोकांबद्दल आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी, मला वाटतं की मी पुढे जाऊन एक नवीन सुरुवात केली पाहिजे. मला देशसेवेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि तुमच्या माध्यमातून माझे काँग्रेस पक्षातील सहकार्यांचे आभार.
शुभेच्छा.
आपला
ज्योतिरादित्य सिंधिया।’’
दरम्यान 14 आमदारांनी राजीनामा पाठवल्यानंतर कमलनाथ सरकार संकटात सापडले आहे. राजीनामा मान्य केल्यास विधानसभेच्या सभापतींसह काँग्रेसचे केवळ 100 आमदार असतील. सध्या कमलनाथ सरकारकडे 4 अपक्षांसह सपाच्या 1 आणि बसपाच्या 2 आमदारांचे समर्थन आहे. अशात कमलनाथ यांच्याकडे 107 आमदारांचे समर्थन असेल. दरम्यान भाजपकडे सुद्धा 107 आमदार आहेत. 16 मार्चपासून सुरू होणार्या विधानसभा अधिवेशनात भाजपने अविश्वास ठराव आणला तर कमलनाथ यांना सरकार वाचवणे कठीण होईल.
या दरम्यान सोनिया गांधी यांनी दिल्लीत आपल्या निवासस्थानी आपत्कालीन बैठक बोलावली. यामध्ये पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते दाखल झाले. सुत्रांनुसार, काँग्रेस सिंधिया यांच्यावर कारवाई करू शकते. दुसरीकडे सिंधियांनी मोदींची भेट घेतल्याच्या बातम्यानंतर भोपाळमध्ये मुख्यमंत्री निवासस्थानावरील वातावरण ढवळून निघाले आहे. बाला बच्चन, हुकुम सिंह कराडा, सज्जन सिंह वर्मा यांच्यासह अनेक मंत्री भेटण्यासाठी तेथे दाखल झाले. बदलत्या घटनाक्रमादरम्यान भाजप मुख्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीत शिवराज सिंह चौहान, पक्षाध्यक्ष व्ही.डी वर्मा आणि विनय सहस्त्रबुद्धे सहभागी आहेत.
काँग्रेस नेते आण मंत्री पी.सी शर्मा म्हटले की, पक्षाच्या नेत्यांसोबत आमचे बोलणे सुरू आहे. आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. सरकार स्थिर असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. तर भाजप नेता नरोत्तम मिश्रा म्हणाले की, आम्ही ज्योतिरादित्य सिंधियांचे पक्षात स्वागत करतो. ते जमिनीशी जोडलेले नेते आहेत. या दरम्यान शेरोशायरी करत ते म्हणाले की, दुश्मनों के तीर खाकर दोस्तों के शहर में, उनको किस-किस ने मारा, ये कहानी फिर कभी।