भोपाळ – मध्य प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपानंतर अखेर आज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे जेष्ठ नेते उपस्थिती होते.
याच दरम्यान, काही सिंधिया समर्थकांचा एक वर्ग त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करत होता. सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष स्थापित करावा अशी मागणी ग्वाल्हेर येथील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.पण, आता सिंधिया यांनी वेगला पक्ष न काढता भाजपमध्येच प्रवेश केला आहे.
नरेंद्र मोदींनी देशाचे नाव जगभरात उंचावले आहे- सिंधिया
पक्ष प्रवेशानंतर बोलताना सिंधिया म्हणाले की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी मला आपल्या भाजपच्या कुटुंबात घेऊन एक स्थान दिले. त्यांचे मी आभार माणतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एखादा एक क्षण असतो, त्यामुळे आयुष्य बदलून जाते. माझ्या आयुष्यात दोन तारखा खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे, 30 सप्टेंबर 2001 मध्ये जेव्हा वडिलांचे निधन झाले. दुसरी तारीख 10 मार्च 2020, त्यांची 75 वी जयंती होती, ज्या दिवशी मी एक नवीन मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला.”
“मी नेहमी आयुष्यात लोकांची सेवा करण्याचेच काम केले आहे. राजकारण फक्त ती सेवा करण्याचे एक माध्यम आहे. माझे वडील आणि मला सोबत जेव्हा वेळ मिळाला, तेव्हा आम्ही देशाची आणि राज्याची सेवा केली. पण, काँग्रेसमध्ये नव्या आणि तरुणांना काम करण्याची संधी मिळत नाही. 2018 मध्ये मध्यप्रदेशाच काँग्रेसची सत्ता आली. तेव्हा मी राज्यासाठी जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण होऊ शकले नाही. 10 दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती, ती अद्याप पूर्ण झाली नाही. बोनस, ओला दुष्काळाची भरपाई इत्यादी गोष्टी शेदकऱ्यांना मिळाल्या नाहीत. ”
” मंदसौरच्या गोळीकांडानंतर मी सत्याग्रह केला, पण आजही हजारो शेतकऱ्यांवर खटले दाखल आहेत. तरुणांना रोजगार नाहीत, दर महिन्याला अलाउंस देण्याची घोषणा करण्यात आली होती, पण ती झाली नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. ट्रांसफर उद्योग, वाळू माफिया मध्य प्रदेशात अजूनही सुरू आहेत. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की, मला देशाची आणि लोकांची सेवा करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाले. मी भाजपचे आभार माणतो. ”
सिंधिया यांनी मंगळवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवून केंद्रात मंत्रिपद दिले जाणार अशी शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा बुधवारी केली जाऊ शकते. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या सरकारमधील 6 मंत्र्यांसह 22 आमदारांनी सिंधिया यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर येताच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी 5 ते 7 आमदारांना मध्य प्रदेशात भाजपची सत्ता स्थापित झाल्यानंतर मंत्रिपद दिले जाणार असे सुत्रांकडून समजते.
मध्य प्रदेशात वाढत्या राजकीय हालचाली पाहता भाजपने आपल्या 105 आमदारांना भोपाळमधून इतरत्र रवाना केले आहे. त्यामध्ये 8-8 आमदारांचे गट तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक गटातील एकाला ग्रुप लीडर करण्यात आले. हाच नेता आपल्या गटातील आमदारांवर नजर ठेवणार आहे. या सर्वच गटांना वेग-वेगळ्या वाहनांमध्ये दिल्ली, मानेसर आणि गुडगाव अशा विविध ठिकाणी पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे, सिंधिया समर्थक आमदार बुधवारी बंगळुरू येथून आणले जातील. मध्य प्रदेश विधानसभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला तेव्हाच या आमदारांना भोपाळला नेले जाणार आहे. अन्यथा राज्यसभा निवडणुकीच्या वेळी अर्थात 26 मार्च रोजी भोपाळला बोलावले जाईल. सोबतच, भोपाळच्या बड्या नेत्यांचे दिल्ली दौरे अचानक वाढले आहेत. केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत.