नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीर पुनर्रचनेचा विधेयक राज्यसभेत मंजुरी मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यावर लोकसभेत चर्चा सुरू करण्यात आली. अमित शहा काही वेळातच लोकसभेत हा ठराव मांडला. तत्पूर्वी लोकसभेत सुद्धा याचे सादरीकरण करण्यात आले होते. परंतु, विरोधी पक्षांनी वॉकआउट केल्याने त्यावर चर्चा होऊ शकली नव्हती. दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. राष्ट्रपतींची स्वाक्षरी होताच जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन वेग-वेगळे केंद्रशासित प्रदेश म्हणून नावारुपाला येतील. या चर्चेत बोलताना, काश्मीरसाठी जीव देण्याची तयारी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत.
सरकारने राज्यघटनेचे उल्लंघन केले -काँग्रेस
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काश्मीरवर बोलताना सुरुवातीला संपूर्ण इतिहास मांडला. कोणत्या परिस्थितीत राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 लागू करण्यात आले याची माहिती दिली. त्यानंतर सरकारने ही कलम रद्द करून राज्यघटनेची कलम 3A चे उल्लंघन केले असा आरोप केला. या कलमानुसार, कुठल्याही राज्याची सीमा बदलताना किंवा विभाजन करताना तेथील विधानसभा किंवा विधान परिषदेचे मत घेणे आवश्यक आहे. परंतु, मोदी सरकारने काश्मीरात राष्ट्रपती राजवट लागू करून तेथील नागरिक किंवा लोकप्रतिनिधींची मते न घेताच हा निर्णय घेतला. असेही मनीष तिवारी म्हणाले आहेत. यूपीए सरकारने आपल्या राजवटीत कधीच अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. थेट कलम 370 परस्पर रद्द करून भाजप सरकार इतर राज्यांना काय संदेश देऊ इच्छिते. काही राज्यांमध्ये कलम 371 नुसार विशेष अधिकार आहेत. त्यांच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे ते हिरावून घेतले जातील का? असा सवाल काँग्रेस खासदारांनी उपस्थित केला.
व्याप्त काश्मीरसह जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक, जीव देऊ शकतो यासाठी
लोकसभेत कलम 370 आणि काश्मीवर चर्चा सुरू असताना काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी एक शंका उपस्थित केली. “अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांच्याशी चर्चा करताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले होते, की काश्मीर भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामध्ये हस्तक्षेप करू नका. अजुनही (कलम 370 रद्द केल्यानंतर) काश्मीर हा दोन्ही देशांचा अंतर्गत मुद्दा राहील का? 1948 पासूनच या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रची नजर आहे. आपण (भारताने) शिमला करार आणि लाहोर डिक्लेरेशन केले आहे. ते काय होते अंतर्गत मुद्दा की द्वीपक्षीय मुद्दा? असा सवाल त्यांनी केला.
> काँग्रेसच्या या प्रश्नाचे उत्तर देताना अमित शहांनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे ठणकावून सांगितले. सोबतच, काश्मीरचा उल्लेख करताना संसदेत नेहमीच मी काश्मीरसह पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साइ चीन या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला आहे. काश्मीरसाठी आपली जीव देण्याची तयारी आहे असे उत्तर अमित शहांनी संसदेत बोलताना दिले आहे.
(वाचकांना ,दर्शकांना फेसबुक च्या पेजवर काही लाईव व्हिडीओ पाहायला मिळतील https://www.facebook.com/MyMarathiNews)