मुंबई – एकीकडे शेतकर्यांना ‘ऐ तू गप्प बस’ अशा धमक्या आणि दुसरीकडे पुरग्रस्त भागातील जनतेचा रोष दाबण्यासाठी भाजपाने जमावबंदीचा आदेश काढला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
हे सरकार जनरल डायरचं सरकार आहे का? असा संतप्त सवाल करतानाच अशा जनरल डायर सरकारला घाबरुन न जाता त्यांना उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला.
पुरग्रस्त भागात 12 ते 24 ऑगस्ट दरम्यान जमावबंदी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील हे शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत तर दुसरीकडे सरकारने पुरग्रस्त भागात 12 ते 24 ऑगस्ट दरम्यान जमावबंदी आदेश निर्गमित केला आहे. सरकारच्या या हुकुमशाही पद्धतीवर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांना अशी दमदाटी करा किंवा जमावबंदी आदेश काढा आम्ही घाबरणार नाही. उलट जनताच याचं उत्तर द्यायला तयार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.