नागपूर -खासदार संजय राऊत यांच्या आईला जिजाऊंची उपमा दिली जाते. तर शरद पवारांना विठ्ठलाची उपमा दिली जाते. ही तुलना योग्य आहे का? महापुरुष आणि विठ्ठलाची तुलना होऊ शकते का?, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक ही तुलना करतात, परंतु खरेच अशी तुलना होऊ शकते का? हा संत, देवांचा अपमान नाही का? असा सवाल विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. यावेळी सत्ताधारी व विरोधकांत भाषण सुरू असताना मोठा गदारोळ झाला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेच्या नेत्या म्हणाल्या की, संजय राऊतांच्या आई म्हणजे जिजाऊंचे रूप आहे. त्यांनी शिवबांसारखा हिरा जन्माला घातला. आपण कुणाची तुलना करतोय. सर्वच माता महान असतात. पण ही तुलना होऊ शकते का, असा सवाल त्यांनी केला.
आमदार अमोल मिटकरी चांगल्या हेतूने बोलले असतील, पण ते म्हणाले की, शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत. शरद पवार मोठे नेते आहेत, पण विठ्ठलाची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य आहे म्हणून संतांचा चमत्कार म्हणता, तर सामान्य माणसांना का शिकवले नाही, असे म्हणत नामदेव महाराजांचा अपमान करीत कुत्र्याला दूध देतात, पण माणसांना देत नाही, असे वक्तव्य आले त्याचा निषेध आपण केला का तर नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, वारकरी संप्रदायांनी जातविरहीत वारकरी समाज उभा केला. त्यात संत चोखोबा आणि ज्ञानेश्वर माऊलीही आहेत, पण त्यांच्या जाती कुणी विचारत नाहीत. कारण ते विचार समाजापर्यंत पोहचवतात. जगद्गुरू तुकोबांची गाथा ज्यांनी वाचवली ते संताजी महाराज जगनाडे हे तुकाराम महाराजांच्या समाजाचे नाहीत परंतु, आज त्यांनाही समाजात विभाजित केले जाते. त्याबद्दल कुणीही काहीच बोलत नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल कलाल यांनी शिवरायांच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंचा फोटो लावून रयतेचा राजा शिवबा माझा असे ग्राफिक्स तयार केले व हॅंडलवर ट्विट केले. अनिल गोटे काय म्हणतात महाराण्या पायलीच्या पन्नास आहेत, राजमाता ऊसाच्या मळ्यात फुटाफुटावर आहेत हे अनिल गोटे म्हणतात. माऊलींबद्दल बोलले जात असेल तर कुणाचा अपमान आहे?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंबद्दल लालूप्रसाद यादव काय म्हणाले होते? त्यांचे खानदान घुसपैठी आहेत. महाराष्ट्र मे घुसखोरी करके आये है. अनिल परबांकडून एकच अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. आपण जे उदाहरणे दिली त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिले नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात आणि त्यांच्या गळ्यात गळे घालून स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे काहीच बोलत नाहीत. सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल किमान त्यांचा अपमान थांबावा. वीरेंद्र जगताप यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावर आपली नाराजी प्रगट केली. कृष्ण आणि भगवान राम यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्यावर ‘मविआ’चे लोक काहीच बोलत नाहीत. गप्प बसतात. छत्रपतींच्या जन्मस्थानाबद्दल बोलले तर चूक आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाबद्दल जर चुकीचे वक्तव्य आले, तर त्यावर काहीच बोलले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.