जळगाव जामोद, दि. २० नोव्हेंबर
भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. छत्रपतींची तुलना भाजपाच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपाच्या प्रवक्तेंनी अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल भाजपाने जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपाच्या नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
जळगाव जामोद येथे पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी व भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीचा खरपूर समाचार घेतला. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपाल कोश्यारींची जीभ कशी झडली नाही? त्यांच्या अशा विधानातून आरएसएसची मानसिकता दिसून येते. महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या दैवतांचा धडधडीत अपमान करण्याची हिम्मत होतेच कशी? निवडणुकीत नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या नावाने मतं मागतात आणि सत्तेत बसून वारंवार त्यांचाच अपमान करता, ही सत्तेची गुर्मी आहे, राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यावेळी म्हणाले की, भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला असून या पदयात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्जा, नवा उत्साह, नवा जोश निर्माण झाला असून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आगामी काळात चांगली कामगिरी करेल व काँग्रेस पक्षाचे नवे रुप यापुढे दिसेल. भाजपाला जनता कंटाळली असून त्यांना पर्याय हवा आहे आणि काँग्रेसच योग्य पर्याय आहे याची जनतेला खात्री आहे. या पदयात्रेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाले, त्यांचे आभार. पदयात्रेत महिला व तरुणांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना जयराम रमेश म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ज्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बदनामी करणे थांबवतील त्या दिवशी आम्हीही आरएसएस व भाजपाबद्दल ‘सत्य’ सांगण्याचे बंद करू.
विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रा हा आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण ठरला आहे. लोकशाहीतील स्तंभ डळमळीत होत असताना ते मजबूत रहावेत यासाठी ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे. याबरोबर जनतेच्या मुलभूत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम झाले. महागाई, बेरोजगारी याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये नैराश्य असल्याचे दिसले, हे वातावरण बदलले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने पदयात्रेचे उस्फूर्त स्वागत केले. तसेच राज्याच्या काना-कोपऱ्यातून विविध सांस्कृतीचे दर्शन दररोज घडले. शेगावची सभा हा पदयात्रेतील परमोच्च क्षण ठरला, अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी सभेला उपस्थिती लावली.
पदयात्रेत विविध सामाजिक संस्था व संघटनांनी सहभाग घेतला त्यात ‘लोकायत’ या संस्थेने भारत जोडो यात्रा कशासाठी आहे, याविषयाची पत्रके वाटून जनजागृती करण्याचे काम केले. पदयात्रा पुढे निघून गेल्यानंतर मागे पडलेला कचरा, पाण्याचा बाटल्या उचलून रस्ता स्वच्छ करण्याचे काम प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने केले. ही दोन्ही कार्य उल्लेखनीय आहेत. जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल थोरात यांनी आभार व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश, प्रभारी, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
शिवरायांचा अपमान कदापी सहन करणार नाही, भाजपाने माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही.
About the author
SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/