लखनऊ-उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपला गळती लागली आहे. आमदार स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह 8 आमदारांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी स्वामी प्रसाद मौर्य आणि धर्म सिंह सैनी यांनी भाजप आणि योगी सरकारवर हल्लाबोल केला. यासोबत, बसप सुप्रीमो मायावती यांच्यावरही निशाणा साधला. समाजवादी पक्षात प्रवेश करताच या नेत्यांनी मोठी विधाने केली आहेत.
योगींच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले, भाजपचा सफाया करून उत्तर प्रदेशला भाजपच्या शोषणातून मुक्त करायचे आहेत. अखिलेश यांच्यासोबत मिळून भाजपचा नायनाट करू. अखिलेश तरुण-तडफदार आहेत. शिकलेले आहेत आणि त्यांच्यात नवीन ऊर्जा आहे.
मायावतींना सुद्धा अहंकार
मौर्य यांनी मायावतींवर सुद्धा हल्लाबोल केला. “ज्यांची साथ सोडतो त्यांना काहीच पत्ता नसतो. बहनजी त्याचेच एक उदाहरण आहेत. त्यांच्यात अहंकार आला होता. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विसरल्या होत्या. काशीराम यांनाही विसरल्या. परिवर्तन आंदोलनाच्या घोषणेलाच बदलले. पिशवीवाल्याच्या मागे उभ्या राहिल्या. मी साथ सोडताच काय हाल झाले त्यांचे.”
योगींनी दलित आणि मागास लोकांचा हक्क हिरावून उच्चवर्णीयांना दिला
भाजपचे मोठ-मोठे नेते कुंभकरणासारखे झोपले होते. त्यांना कधी आमदार किंवा मंत्र्यांशी बोलायला वेळ नव्हता. आता आम्ही राजीनामा दिला तेव्हा त्यांची झोप उडाली आहे. आजही सत्तेत आलेल्यांपैकी 5 टक्के लोक केवळ मलई खातात. आता 80 आणि 20 ची नाही तर 15 आणि 85 अशी लढाई आहे. 85 आमचे आहेत आणि 15 मध्ये आधीच फूट पडली आहे. योगींनी दलित आणि मागास लोकांचा हक्क हिरावून उच्चवर्णीयांना दिला आहे असा आरोपही मौर्य यांनी केला.
सीएमच्या खुर्चीवर बसून पाप करत आहेत योगी
एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्री पदावर बसून योगी आदित्यनाथ पाप करत आहेत आणि हिंदूंचा दाखला देतात. दलित हिंदू नाहीत का? तुमच्या नजेर केवळ 5 टक्के लोक हिंदू असतील तर मग आम्ही तुमची वाट लागणे निश्चित आहे अशा शब्दांत मौर्य यांनी योगींना सुनावले.
भाजपचे आणखी एक मंत्री राहिलेले धर्म सिंह सैनी यांनी तर अखिलेश भावी नाही तर मुख्यमंत्रीच आहेत असे म्हटले आहे. कोरोना आणि आचारसंहिता नसती तर त्यांना 10 लाख लोकांची सभा घेऊन सन्मानित केले असते. दलित आणि मागास वर्गाने त्यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. भाजपच्या तुलनेत कित्येक पट अधिक सन्मान समाजवादी पक्षात येणाऱ्यांना मिळत आहे.