मुंबई-सर्व निवडणुका सुरळीतपणे होतील, सरकार सुरळीत चालेल आणि अशा कारवायांमुळे भारतीय जनता पक्ष रोज खड्ड्यात जातो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या 55 वर्षात कधी मिळाले नव्हते, तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहे, म्हणून राज्यातील विरोधकांना अशा प्रकारे नामोहरम करणे वाटत असेल तर शिवसेनेचे मनोबल किंबहुना महाविकास आघाडीचे मनोबल अजिबात खच्ची होणार नाही, अशा कारवायांमुळे आमचे मनोबल वाढत जाईल.महाविकास आघाडी परिवहन मंत्री अनिल परबांच्या पाठिशी आहे. ईडीच्या कारवायांमुळे भाजप रोज खड्ड्यात जातोय, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. अनिल परब यांच्या सात ठिकाणांवर आज ईडीने कारवाई केली. त्यानंतर राऊत प्रसारमाध्यमांशी मुंबईत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अनिल परब हे आमचे सहकारी आहेत. ते एक कॅबिनेट मंत्री आहेत. पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहेत. ज्या प्रकारचे ईडीकडून अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर आरोप लावण्यात आले, त्यापेक्षाही गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय जनता पक्षांच्या लोकांवर आहेत. पण त्यांना कोणीही हात लावत नाही. आम्ही सगळे, पक्ष आणि सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तुम्ही सूडाच्या आणि बदलाच्या भावनेने कितीही कारवाई करा, तरीही आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी आगपाखड केली.शिवसेनेचे उमेदवार आज दुपारी 1 वाजता राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील यावेळी उपस्थित राहणार आहे. महाविकास आघाडी एक होती आणि एकच राहिल, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, आमच्याकडे देखील भारतीय जनात पक्षाच्या लोकांचे असंख्य पुरावे आहेत. कारवाया झालेल्या आहेत. जितू नवलानीला कोणी पळवले? याचा उत्तर त्यांनी द्यावे, असा सवाल राऊतांनी भाजपला केला आहे. महाराष्ट्रातल्या आणि पश्चिम बंगालमधल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या ज्या कारवाया सुरू आहेत, ते फक्त राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे. महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी सुरू आहे, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेला त्रास द्यायचा, आम्हाला बदनाम करायचे, महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणायचे, त्यांची कोंडी करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा सरळ सरळ गैरवापर करून हा प्रयत्न केला जातो. पण आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. दिल्लीला देखील भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांचे कागदपत्रे दिले आहेत. त्यावर साधे केंद्राकडून उत्तर येत नाही. विक्रांत घोटाळा हा या देशातला सर्वात मोठा घोटाळा आहे. मात्र, त्यांना दिलासा मिळतो. टॉयलेट घोटाळा अजून मोठ्या प्रमाणात समोर येईल. मानहानीचा गुन्हा दाखल केला म्हणून मी मागे हटणार नाही. इतर काही प्रकरणांमध्ये आम्ही हात घातला आहे. आम्ही त्यासंबंधीचे कागदपत्रे ईडीकडे पाठवलेली आहेत. ती फाईल देखील उघडण्याची त्यांची मानसिकता नाही, पण एक लक्षात घ्या आम्ही पण तुम्हाला पाहून घेऊ, असा इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे.