मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘जर या राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर पक्षभेद बाजूला ठेवून आपण सर्व महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की, आपण जर शांत बसलो तर आपल्या शूर-वीर म्हणवल्या जाणाऱ्या राज्याच्या अब्रुची लक्तरे या लोकांकडून वेशीवर टांगली जातील. त्यामुळे येते दोन-चार दिवस आपण वाट पाहू आणि राज्यपालांना हटवलं नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांना एक खणखणीत इंगा दाखवलाच पाहिजे. मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करायचा की मोर्चा काढायचा हे आपण ठरवू,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ही शक्कल एकट्या राज्यपालांच्या काळ्या टोपीतून आलेली नाही. त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, हे शोधण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील आदर्शांचा हळुवारपणे अपमान केला जात आहे. मागे भगतसिंह कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलले होते. सातत्याने अपमान करून महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेले आदर्श नष्ट करायचे. मग भाजपच्या काही भाकड नेत्याची नवे आदर्श म्हणून जनतेच्या मनात प्रतिमा बिंबवण्याची चाल खेळली जात आहे. त्याला विरोध झाला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. कर्नाटकचे मुख्यंत्री महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगतात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवतांचा अपमान होत आहे. पण मुख्यमंत्र्यांना त्याची कोणतीही खंत किंवा चिंता नाही. काहीतरी गोलमाल उत्तर देऊन ते वेळ मारून नेतात. या राज्याला मुख्यमंत्री आहे का तेच कळत नाही. ते कधीही बोलतच नाहीत. महाराष्ट्रातील ४० गावं कर्नाटकमध्ये जात असतीत तर मुख्यमंत्री नेहमीच्या शैलीत उत्तर देतील. ते म्हणतील, काळजी करु नका. मी पंतप्रधानांना फोन केला होता. त्यांनी सांगितलं आहे की, कर्नाटकने महाराष्ट्रातील ४० गावं घेतली तर घेऊ दे. आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यावर १०० गावं महाराष्ट्राला देऊ, असं कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षाच नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील सारवासारव करत आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की, भाजपच्या अखत्यारितील राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या वरिष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू शकतात का? मग तसं नसेल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करण्याचा हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? तसे असेल तर सर्व महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
‘महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना मानतो. मात्र त्यांचा अपमान झाल्यावर भाजपच्या लोकांकडून गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. केंद्रात ज्यांचं सरकार असतं त्यांच्या विचारांची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात. मात्र या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते? ज्या माणसांना वृद्धाश्रमातही जागा मिळत नाही, त्यांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवण्यात आले पाहिजेत. आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणंच मी सोडून दिलं आहे. राज्यपालपदाची झूल पांघरली म्हणून त्यांनी काहीही बोलावं, हे सहन केलं जाणार नाही. कोश्यारींनी याआधीही मराठी माणसांचा अपमान केला होता. या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यासह केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.