मुंबई-
मी वॉशरूमला गेलो, तरी माझ्या नाराजीची चर्चा होते. मी वॉशरूमला जायचे नाही का, असे म्हणते विरोधी पक्षनेते अजित पवार यांंनी नाराजी नाट्यावर पडदा टाकला. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सभेला गर्दी जमवण्याची वेळ यावी, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची टीकाही त्यांनी केली.
लंपी रोग ते नाराजी नाट्य, मुख्यमंत्र्यांची सभा या साऱ्यावर अजित पवारांनी आज विधान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
काय म्हणाले पवार?
अजित पवार म्हणाले की, “मी अधिवेशनादरम्यान वॉशरूमला गेलो होतो आणि इकडे अजित पवार उठून बाहेर गेल्याची चर्चा रंगू लागल्या. मला राजकारणात येऊन 31 वर्ष होत आली. मी राष्ट्रीय पातळीवर जातो, उपस्थित राहतो, पण मी मार्गदर्शन करत नाही. वेळेअभावी मला राष्ट्रीय अधिवेशनात बोलता आले नाही. मी नाराज नसून मला बोलण्यापासून कुणी अडवले नाही राज्यामध्ये कुठे सभा, अधिवेशन असेल तर नक्कीच बोलेल.
यामुळे बोलणे टाळले
राष्ट्रवादीचे दोन दिवसीय अधिवेशन नुकतेच दिल्लीत पार पडले, त्यात अजित पवारांना बोलू न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती, त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नेत्यांनी आणि प्रांताध्यक्ष यांनी बोलणे अपेक्षित असते, त्यामुळे मी तिथे बोलणे टाळले. परंतु माध्यमांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. वास्तविक मला तिथे कोणी बोलू नका असे कोणीही सांगितले नाही. मीच माझी भूमिका घेतली. मी एकटाच बोललो नाही असे नाही, सुनिल तटकरे, वंदना चव्हाण यांच्यांसह अनेक जण तिथे बोलले नाही.” असे पवार म्हणाले.
लंपीबद्दल चिंता व्यक्त
पुढे लंपी स्किन जनावरांच्या आजाराबाबत माहिती देताना पवार म्हणाले की, “सध्या देशपातळीवर विशेषत: पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यात तसेच महाराष्ट्रामध्येही ‘लंपी स्किन डिसीस’ हा आजार मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा हा आजार असून, याची काळजी आपल्याला घेणे गरजेचे आहे. कारण इतर राज्यात अनेक जनावरे दगावली आहेत.”
अभ्यास सुरू
पुढे अजित पवार म्हणाले की, “ज्या जनावरांना लंपी आजार झाले त्याचे दूध पिल्यानंतर माणसाच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? याचा अभ्यास सध्या सुरू आहे. म्हशीला हा आजार होत नाही, मात्र बैल, गायी तसेच वासरूंना हा आजार होतो, अशी माहिती आमच्याकडे आली” असल्याचेही पवार म्हणाले.
शेतकऱ्यांवर मोठा परिणाम
“देशपातळीवर या आजाराची लस सध्या दोनच कंपनी तयार करतात. त्यात एक कंपनी महाराष्ट्रात आणि दुसरी हैदराबादमध्ये आहे. मात्र, सध्या सर्व लसी केंद्राने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. राज्य सरकारने दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना महत्वाचा व्यवसाय म्हणून बघणे गरजेचे आहे. कारण, दुधाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. त्यामुळे दुधाच्या किंमतीत वाढ होत आहे. जनावरे दगावली तर याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे.” असेही पवार यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
ओडिसात पहिल्यांदा नोंद
ऑगस्ट 2019 मध्ये भारतात पहिल्यांदा या आजाराची नोंद ओडिसा राज्यात झाली. महाराष्ट्रात या आजाराचा प्रसार मार्च 2020 मध्ये गडचिरोलीत झाला. मात्र, आता तो आजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजाराचा मानवावर परिणाम होत नसल्याचेही पवार म्हणाले.
1 ऑक्टोंबरपासून गाळप सुरू
पुढे यंदाच्या साखर हंगामाबाबत माहिती देताना पवार म्हणाले की, 16 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे. त्यानंतर येत्या 1 ऑक्टोंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप सुरू होण्याची शक्यता आहे. ऊस तोडणी कामगार तोडणीसाठी बैलांचा वापर करतात आणि अशा वेळी जर हा आजार फोफावला तर याचा फटका साखर हंगामात देखील पाहायला मिळू शकते, त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
हे राज्याचे दुर्दैव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठणमध्ये जाहीर सभा होणार असून, त्यात तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, हे राज्यात पहिल्यांदा घडत आहे. आज अंगणवाडी सेविका सभेसाठी गेल्या मग त्या अंगणवाडीतील मुलांनी काय करायचे. गर्दी जमवण्याकरीता ही जर परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली असले तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे फार गंभीरते सरकारने घेतले पाहिजे. ते कदाचित सांगतील की, कुणीतरी आदेश काढलेत. आम्ही पण सरकारमध्ये होतो, परवानगी शिवाय कोणीही परस्पर आदेश काढत नसल्याचेही पवार म्हणाले.