नवी दिल्ली- मीच काँग्रेसची फुल टाइम अध्यक्ष असल्याचा स्पष्ट संदेश सोनिया गांधींनी शनिवारी काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिला आहे. गेल्या वर्षी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्षाची गरज असल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावरूनच कुणाचेही नाव न घेता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षातील नेत्यांना हा संदेश दिला. सोबतच, जे काही बोलायचे असेल तर स्पष्ट माझ्याशी बोला मीडियाच्या माध्यमातून नको असेही सोनिया गांधींनी ठणकावले आहे.
स्वतःवर नियंत्रण, शिस्त तेवढेच महत्वाचे
काँग्रेसमध्ये होणाऱ्या संघटनात्मक बदलावांची प्रक्रिया सुरू असून वेणुगोपाल याची सविस्तर माहिती देतील असेही सोनिया गांधींनीनी सांगितले. काँग्रेस पूर्ण ताकदीने पुन्हा उभी व्हावी असे सर्वांना वाटते. परंतु, यासाठी एकता आणि पार्टीच्या हितांना प्राधान्य देण्याची गरज आहे. यापेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे, स्वतःवर नियंत्रण आणि शिस्तबद्धता आहे असेही त्या पुढे बोलताना म्हणाल्या.
गतवर्षी लिहिले होते पत्र
उल्लेखनीय बाब म्हणजे, काँग्रेसच्या 23 नेत्यांनी गतवर्षी सोनिया गांधींना एक पत्र पाठवले होते. यामध्ये पक्षात मोठे बदल आणि नेतृत्वाची गरज व्यक्त केली होती. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश होता. अगदी खालच्या स्तरापर्यंत काँग्रेसमध्ये बदल होणे आवश्यक आहे. अन्यथा काँग्रेसच्या प्रगतीचा आलेख ढासळत राहील असा इशाराही या नेत्यांनी दिला होता. पक्षाला पंजाबसह छत्तीसगडमध्ये सुद्धा समस्या येत असल्याची खंत या नेत्यांनी व्यक्त केली होती.
अंतर्गत मतभेद काँग्रेससाठी आव्हान
काँग्रेस कार्य समितीच्या आजच्या बैठकीत पक्षांतर्गत शिस्त आणि त्यासंबंधित मुद्दे महत्वाचा विषय आहेत. सोबतच, पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकींवर रणनिती आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक या बैठकीतील इतर महत्वाचे मुद्दे आहेत. काँग्रेसला गेल्या काही वर्षांपासून अंतर्गत मतभेदांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच, राहुल गांधी यांचे सर्वात जवळचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसच्या भविष्याची चिंता आहे. तर दुसरीकडे, राजस्थानमध्ये सत्ता असली तरीही मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात समन्वय प्रस्थापित करणे काँग्रेससाठी आव्हान ठरत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांविषयी बोलताना काँग्रेस अध्यक्ष्या सोनिया गांधी म्हणाल्या, “आम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण जर आपण एकजूट आणि शिस्तबद्ध राहिलो आणि केवळ पक्षाच्या हितावर लक्ष केंद्रित केले तर मला खात्री आहे की आम्ही चांगले काम करू.” उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची माहितीही सोनिया गांधी यांनी दिली.
यावेळी सोनिया गांधी यांनी लखीमपूर खेरीच्या घटनेवरही भाष्य केले. अलीकडे लखीमपूर-खेरीसारख्या धक्कादायक घटना भाजपाची मानसिकता दर्शवतात. यातून ते शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे कसे पाहत आहेत ते स्पष्ट दिसते. यातून स्पष्ट दिसते की भाजपा शेतकऱ्यांच्या जीवनाच्या आणि त्यांच्या उपजीविकेच्या संरक्षणासाठी या स्थिर संघर्षाला कसे सामोरे जात आहे.”
दरम्यान, काँग्रेसच्या ‘जी २३’ गटाच्या नेत्यांकडून पक्षात चर्चेसाठी मागण्या आणि अलिकडच्या काही महिन्यांत अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. अलीकडेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी सीडब्ल्यूसीची बैठक घेण्याची मागणी केली होती. आझाद यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची तात्काळ बैठक घेण्याचे आवाहन केले होते. पक्षाच्या पंजाब युनिटमध्ये झालेल्या गोंधळादरम्यान सिब्बल यांनी अलिकडच्या काळात पक्ष नेतृत्वावर प्रश्नही उपस्थित केले होते.