मुंबई, दि. १६ सप्टेंबर – मराठा समाजाचे अजून किती बळी या सरकारला हवे आहेत ? अनेक ठिकाणी आत्महत्या झाली. किती तरी तरुणांनी समाजाच्या आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करले तरी या सरकारला जाग येत नाही. राज्यात मराठा समाज आपल्या हक्कासाठी आत्महत्या करणार असेल तर हे दुर्दैवी आहे. राज्य सरकारने आता तरी जागे होऊन उपाययोजना करावी, अशी मागणी आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
मराठा आरक्षण नसल्याने काल एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली. त्यावर बोलताना दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मराठा समाजाचे अजून किती बळी या सरकारला हवे आहेत? अनेक ठिकाणी आत्महत्या झाली, किती तरी तरुणांनी समाजाच्या आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करले. बेरोजगारीने उद्भवलेल्या परिस्थितीने आज लोकं आत्महत्या करणार असतील आणि या सरकारला जाग येणार नसेल तर हे दुर्दैवी आहे. सरकारला याची किंमत मोजावी लागेल. त्यामुळे सरकारने जागे होत तात्काळ लोकांच्या भावना समजून उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपशी युती हाच पर्याय, असा लेख लिहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले, संभाजी ब्रिगेडने असे वक्तव्य केले असेल तर त्याचे स्वागतच आहे. मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा पूर्णपणे भ्रमनिरास केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, ते दिले आणि टिकवलेसुद्धा परंतु महाविकास आघाडीला आरक्षण राखता आले नाही हे मराठा समाजातील लोकांना समजले आहे. तसेच निवडणुका लढावाव्यात की नाही हा निर्णय वरच्या पातळीवर होईल, असेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.