नागपूर-मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनात सभागृहात का उपस्थित नाहीत, असा खडा सवाल मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हजेरी लावली.उल्हानगरच्या पाणीप्रश्नावरून विरोधकांनी सरकारला घेरले. इथल्या नागरिकांना दीडपट दंडाचा भुर्दंड कशासाठी, असा सवाल यावेळी अजित पवारांनी केला.
विधानसभेत उल्हासनगरचा पाणीप्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, आजही प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले. याप्रकरणी उदय सामंत यांनी उत्तर दिले. मात्र, त्यामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी उत्तर दिले असते, तर बरे झाले असते. शासन काय ठोस उपाययोजना करणार. दीडपट दंड आकारणी करून नागरिकांना पाणी मिळते. त्या नागरिकांचा दोष काय, असा सवाल त्यांनी केला.
अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात हजेरी लावली पाहिजे. दिल्ली दौरा वगैरे महत्त्वाच्या प्रश्नी आम्हीही समजू शकतो. मात्र, अनेक मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला हजर असले, तर इतर प्रश्नात ते हस्तक्षेप करून न्याय देऊ शकतात. देवेंद्र फडणवीस यांनीही तसे केले. मागेही अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे केले. ही परंपरा आणि पद्धतय. विधिमंडळाला मान सन्मानय. याची नोंद सरकार घेणार आहे का?, असा सवाल पवार यांनी केला.
अजित पवारांच्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहतील. आजही राहतील. मात्र, मात्र, आम्हाला तुम्ही सभागृह चालू देणार हे माहित नव्हते. या उत्तरावरही अजित पवारांनी हरकत घेत, मग आपण कसे आलात, असा सवाल केला. सभागृह चालतंय म्हणल्यावर घाईघाईने आलो, असे उत्तर दिले. विशेष म्हणजे पुढच्या पाच मिनिटांत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हजेरी लावली.