महाराष्ट्र काय आहे दाखवून द्यायची वेळ आलीय-उद्धव ठाकरे
राज्यपालांना मोर्चापुर्वी हटवले तरी मोर्चा निघणार – अजित पवार
मुंबई: राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे, शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं जात आहे, सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. त्याविरोधात आता येत्या 17 तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये मोर्चाचा हा निर्णय घेण्यात आला.
महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी आणि कटकारस्थान करून पाडले. हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा निकाल लागायचा आहे. पण, ते अस्त्वितात आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्याने होणारी अवहेलना, अपमान आणि फुटीरतेची बीजं टाकण्यात येत आहेत. काही गाव कर्नाटकात, तेलंगणा आणि गुजरातमध्ये जायचं म्हणत आहेत. हे आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. छत्रपतींचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होतोय, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला आहे.“कर्नाटक सरकार आक्रमकपणे महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहे. अक्कलकोट, सोलापूर आणि मग पंढरपूरच्या विठोबावर सुद्धा ते हक्क सांगतील. त्यामुळे आपल्या राज्यात सरकार आहे का नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून यांनी महाराष्ट्राचे उद्योग पळवले. त्यानंतर आता कर्नाटकची निवडणूक पण होणार आहे, त्यामुळं महाराष्ट्राची गावं ते कर्नाटकला जोडणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांची बैठक झाली त्यानंतर आमच्या मित्र पक्षांशी बोलल्यानंतर सर्वांनी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे.त्यामुळं येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी १७ डिसेंबरला शनिवारी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान अशा विराट मोर्चाचं मविआनं आयोजन केलं आहे. यामध्ये केवळ मविआचं नव्हे तर ज्यांना महाराष्ट्राचा अपमान सहन झालेला नाही त्यांनी महाराष्ट्राच्या एकजुटीचं विराट दर्शन या मोर्चातून घडवावं असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
उद्धव ठाकरे यांनी हा मोर्चा केवळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्यासाठी नाही. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या सर्वांच्या विरोधात हा मोर्चा असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचं चांगलं चाललेलं सरकार गद्दारी आणि कटकारस्थान केल्यानंतर जे सरकार आलं ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे याचा निकाल अजून लागायचा आहे. हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची होणारी अवहेलना, अपमान विशेष म्हणजे महाराष्ट्रात फुटीरतेची बिजं दिसत आहेत. काही गावं कर्नाटकमध्ये, काही गावं तेलंगाणा, काही गावं गुजरातमध्ये जायचा दावा करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं घडतंय. अक्कलकोटवर हक्क सांगत आहेत. सोलापूरवर हक्क सांगत आहेत म्हणजे आमचा पंढरपूरचा विठोबा देखील नेण्याचा प्रयत्न आहे, असं ठाकरे म्हणाले.राज्यपाल म्हणून कुणालाही पाठवलं जात आहे. राज्यपाल महाराष्ट्राच्या आदर्शांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता, आदर्श यांना छिन्न विच्छिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुजरातच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातले प्रकल्प तिकडे गेले. कर्नाटकच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील गावं तोडून तिकडे जाणार का असा सवाल आहे. पण, मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहेत हे कळणार कधी? महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकला जाणार होते, तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यावर हा दौरा रद्द झाला. इतका नेभळट महाराष्ट्र कधी झाला नव्हता. महाराष्ट्र काय हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. विधानमंडळाचं अधिवेशन १९ डिसेंबरला नागपूरला सुरु होत आहे. मविआचं नव्हे तर ज्यांना अपमानामुळं ठेच पोहोचली आहे. त्यांनी यामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राची ताकद दाखवून देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक ८ डिसेंबरला होणार आहे. ८ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा निघणारच, असा इशारा अजित पवार यांनी दिला. महाराष्ट्र कधीही कुणापुढं झुकला नाही मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला की मंत्री जाणार नाही असं सांगतात, काय चाललंय या राज्यात असं अजित पवार म्हणाले.
शिंदे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्यानं अवहेलना होत आहे. महाराष्ट्राचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपासून स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून महाराष्ट्राच्या महापुरुषांची अवहेलना केली जात आहे. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड असंतोष असून तो या महामोर्चाच्या माध्यमातून दाखवून देऊ, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.