मुंबई-महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निडवणुकीचे निकाल हाती आल्यानंतर हरियाणामध्ये भाजपाने सत्ता स्थापन केली असली तरी महाराष्ट्रात सत्तेची समिकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी याच जुळवाजुळवीवरुन भाजपाला टोला लगावला आहे. ‘भाजपा सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांसमोर भीक मागत आहे,’ अशी टीका आझाद यांनी केली आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची स्वबळावर सत्ता येईल असा अंदाज एग्झीट पोलने व्यक्त केला होता. मात्र दोन्ही राज्यांमध्ये बहुमत मिळवण्यात भाजपाला अपयश आले आहे.“देशात जर लोकशाही असती तर आज जे काश्मीरमध्ये सुरु आहे ते झाले नसते. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चोर दरवाजाने काश्मीरसंदर्भातील विधेयक आणले. लोकशाहीचे मंदीर असणाऱ्या संसदेमध्ये ते हुकमशाही पद्धतीने वागत आहेत,” असं टोलादेखील आझाद यांनी लगावला आहे.
“नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल पाहून मला भारतीय मतदारांचे अभिनंदन करायचे आहे. हरियाणा असो किंवा महाराष्ट्रातील निवडणूक किंवा पोटनिवडणुक भाजपा पूर्णपणे हरला आहे. आता ते चौटाला आणि इतर अपक्षांसमोर सत्ता स्थापनेसाठी भीक मागत आहेत. त्यांना अद्याप महाराष्ट्रात सत्ताही स्थापन करता आली नाही,” असा टोला आझाद यांनी लगावला आहे. दिल्लीमधील एका जाहीर सभेमध्ये भाषणादरम्यान त्यांनी ही टीका केली. देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपा दोन तृतीयांश जागांवर पराभूत झाल्याचा टोलाही आझाद यांनी लगावला आहे.
“निवडणूक जवळ आल्यावर मते मिळवण्यासाठी क्षेपणास्त्रे डाकण्याचे भाजपाचे समिकरण जनतेने नाकारले आहे. आता लोकांना शेकतकऱ्यांचे आत्महत्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था यासारख्या समस्या महत्वाच्या वाटू लागल्याचे हे संकेत आहेत. मात्र भाजपाला या प्रश्नाबद्दल काहीच वाटत नाही,” असं आझाद आपल्या भाषणात म्हणाले आहेत. “भाजपाला जनतेची चिंता नाही. नोटबंदी अनेकांचे रोजगार बुडाले किंवा जीएसटीमुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले तरी भाजपाला त्याचे काहीच वाटत नाही. पेट्रोलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सरकार रिझर्व्ह बँकेकडून पैसा घेत आहे,” असंही आझाद आपल्या भाषणामध्ये म्हणाले आहेत.
भाजपा केवळ निवडणुका लढण्यासाठी सत्तेत आलेला पक्ष आहे अशी टीकाही आझाद यांनी केली आहे. “भाजपावाले स्वप्नातही निवडणुकाच लढवत असतात. ते कामाच्या वेळीही केवळ निडवणुकांच्या नियोजनाबद्दल चर्चा करण्यात व्यस्त असतात,” असं आझाद म्हणाले आहेत. “देशात जर लोकशाही असती तर आज जे काश्मीरमध्ये सुरु आहे ते झाले नसते. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चोर दरवाजाने काश्मीरसंदर्भातील विधेयक आणले. लोकशाहीचे मंदीर असणाऱ्या संसदेमध्ये ते हुकमशाही पद्धतीने वागत आहेत,” असं टोला आझाद यांनी लगावला आहे.