मुंबई -महापालिकेत 400 किमी रस्त्यांसाठी सुमारे ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या घोटाळ्याला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कारणीभूत धरलं असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी इतरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत अंतर्गत ४०० किमी रस्त्यांच्या काँकेटीकरणासाठी तीन वर्षात ६,००० कोटींची कंत्राट काढणं अपेक्षित होती ती एका वर्षासाठी काढण्यात आली. पण या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर ही टेंडर रद्द करण्यात आली.खोके सरकारकडून मुंबईला एटीएमसारखं वापरलं जात आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
महापालिकेची लूट या सरकारकडून केली जात आहे. या सरकारने काढलेल्या रस्त्याच्या टेंडला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हे टेंडर रद्द करावं लागलं. त्यानंतर आता नवं टेंडर काढण्यात आलंय. 400 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 6080 कोटी रूपयांचं हे टेंडर काढण्यात आलंय. या टेंडमधून कंत्राटदारांना 48 टक्के फायदा करून देण्यात आलाय. त्यामुळेच मुंबईतील सिमेंट-कॉंक्रिटच्या रस्ते कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. “मुंबईतील कामं करण्याचा कालावधी हा 1 ऑक्टोबर ते 31 मे असा असतो. कारण उर्वरित काळात पाऊस असतो. पावसाळ्यानंतर सुरू झालेली कामं पावसाळ्याआधी पूर्ण होतात. परंतु, आता हाती घेतलेली कामं पावसाळ्याआधी पूर्ण होतील का याचा यांनी अभ्यास केला नाही. हे सर्व होत असताना कंत्राटदारांना 48 टक्के फायदा करून देण्यात आला. मुख्यमंत्र्यांना मुंबईतील कामे कशी करतात हेच माहिती नाही. महापालिकेत कोणतीही बॉडी आणि महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाने ही कामे मंजूर कशी केली? हा खूप मोठा प्रश्न आहे. टेंडरचा हा पैसा मुंबईकरांच्या खिशातील आहे. कामाची समज नसतानाही टेंडर काढण्यात आलं. मुंबईतील टेंडर हे इतर राज्यांतील टेंडरपेक्षा वेगळं असतं. मुंबईत सिमेंटचे रस्ते केले जात आहेत. मग गेल्या सात वर्षांपासून आताचे मुख्यमंत्री हे मंत्री होते, त्यावेळी त्यांनी ठाण्यातील रस्ते सिमेंटचे का केले नाहीत, असा प्रश्न यावेळी आदित्य यांनी उपस्थित केला आहेदरम्यान, राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून मोघलाई आल्यासारखं वाटत असल्याची टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केलीय. “गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात मोघलाई आली आहे असं वाटतं. गणपती मिरवणुकीत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांकडून फायरिंग करण्यात आली. आमदाराच्याच बंदुकीतून गोळी चालवण्यात आली होती. तरी देखील आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही. पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळसारखे अनेक प्रकार राज्यात झाले आहेत. परंतु, कोणावरच कारवाई झालेली नाही. गेल्या सहा महिन्यात आम्ही सतत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करत आहे. परंतु, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके असे सध्या राज्यात सुरू आहे. याबरोबरच अनेकवेळा महापुरूषांचा अपमान दरून देखील राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा प्रकारांच्या मागून मुंबईला लुटण्याचा प्रकार केला जात आहे. नागपूरच्या एनआयटी घोटाळ्बयाद्दल देखील आम्ही बोललो पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.