सोलापूर – अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते, पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला आहे .राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखाने आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. या छापेमारीवर त्यांनी हे भाष्य केले आहे.
सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये बोलत असताना शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मला देखील ईडीची नोटीस आली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही, त्या बँकेचे मी कधीही कर्ज आयुष्यात घेतले नाही. त्यावर मला नोटीस पाठवण्यात आली होती. मला ईडी पाठवली पण लोकांनी भाजपला वेडे ठरवले. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. त्यांना जनता धडा शिकवेल’ असेही शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित ठिकाणांवर गुरुवारी आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये आहे. बुधवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली. अजित पवार यांच्यांशी संबंधीत सर्वच ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. पवारांशी संबंधीत कारखान्यांच्या संचालकांच्या घरी देखील छापेमारी करण्यात आली होती.