पुणे : सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, असा एल्गार खासदार संजय राऊत यांनी शिरुरमध्ये जाऊन केला. आढळरावांचं शिवसेनेसाठीचं काम मोठं आहे. त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असंही राऊत म्हणाले. त्यामुळे सध्या शिरुर लोकसभेचे खासदार असलेले राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांना हे आव्हान मानायचं काय ? असा प्रश्न राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
खासदार संजय राऊत कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी आढळरावांचं होम ग्राऊंड असलेल्या शिरुर-आंबेगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आढळराव पाटील यांचं शिवसेनेसाठीचं योगदान अधोरेकित करताना एकप्रकारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना इशारा दिला. शिरुर लोकसभेच्या जागेसाठी आम्ही एकत्रित बसणार आहोत. पण एवढं नक्की सांगतो, भविष्यात शिवाजीराव आढळराव पाटील संसदेत असतील, असं राऊत म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. येणाऱ्या काळातील सगळ्या निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचंही राऊत म्हणत आहेत. पण शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेदरम्यान पारंपारिक लढत होते. २०१९ च्या लोकसभेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर अभिनेते अमोल कोल्हेंनी शिवसेनेला धक्का देत आपल्या मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आणि लोकसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारण्यापासून आढळरावांना रोखलं. शिरुरच्या राजकीय मैदानात नवख्या कोल्हेंनी दिग्गज आढळरावांना चारी मुंड्या चित केलं. आता लोकसभा निवडणूक दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्रित लढण्यासंबंधी निर्णय घेतला तर शिरुरच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मोठी गरमागरमी होणार हे निश्चित… त्यामुळे दोन्ही नेत्यांची महत्त्वकांक्षा आणि त्यांचा समझोता, शिवसेना-राष्ट्रवादी कशा पद्धतीने घडवून आणते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
“शिरुर लोकसभेसंदर्भात आम्ही एकत्र बसणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढळरावांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. आढळरावांनी गेल्या अनेक वर्षांपासून सेनेसाठी केलेलं काम, त्यांच्या कामाची इतिहासात नोंद आहे. कुणी काहीही म्हणत असतील, पण भविष्यात शिवाजीराव आढळराव पाटील हे संसदेत असतील”, असं राऊत म्हणाले.