नागपुर-विरोधकांनी भाजपला चिमटे काढत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याविषयी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. ‘आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली झाली. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एकप्रकारे सुटका झाली’, असे ते म्हणाले.
आता संविधानाच्या विरोधात झाले असेल त्या सर्वांची चौकशी व्हायला हवी
‘राज्यपाल बदलण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. हा निर्णय फारपूर्वीच घेणे गरजेचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. राष्ट्रपतींनी राज्यपाल बदलला ही अतिशय समाधानकारक बाब आहे. आता संविधानाच्या विरोधात झाले असेल त्या सर्वांची चौकशी व्हायला हवी,’ असे पवार यांनी सांगितले.गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त विधाने आणि भूमिकांमुळे विरोधी पक्ष आणि विविध संघटनांच्या रडारवर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली. राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्याची मागणी त्यांनी मोदींकडे केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवसाची सुरूवात चांगली झाली अशी प्रतिक्रिया दिली.
भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चेत राहिले ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारसोबतचा त्यांचा संघर्ष सातत्याने उफाळून आला. विधान परिषदेतील 12 जागांच्या नियुक्त्या असो की, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आदेश देणे, अशा विविध कारणांमुळे महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर समांतर सरकार चालवण्याचा आरोपही झाला. गेल्या काही महिन्यात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरुन तीव्र पडसाद उमटले आणि कोश्यारींना अखेर पदमुक्त करण्यात आले.
भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल महिनाभरापूर्वी बोलतानाही शरद पवार यांनी ते गेल्यास महाराष्ट्राची सुटका होईल अशी प्रतिक्रिया दिली होती. 18 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, “भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा आम्ही ऐकली आहे. आमच्याकडेही ठोस माहिती नाही. पण एवढंच सांगतो, या सगळ्यात एकच गोष्ट चांगली होईल. आताच्या राज्यपालांपासून महाराष्ट्राची सुटका झाली तर आम्हाला आनंदच होईल’, असे ते म्हणाले होते.