‘मुंबई-व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही,रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही,साधे बेड उपलब्ध नाही! मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. लस येत आहेत, येत राहतील.पण,प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते.याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का ?’, असा सवाल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे . तसेच, ‘राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच. परंतू त्यासोबतच सरकारच्या गैरकारभारावर होत असलेली टीका आणि विविध प्रकरणात न्यायालयात निघत असलेले वाभाडे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी व्हॅक्सिनवर राजकारण कृपया करू नये, ही कळकळीची विनंती आहे’, असेही ते म्हणाले.
कोरोना लसीकरणावरुन महाराष्ट्र आणि केंद्र सरकार पुन्हा आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. राज्यात कोरोना व्हॅक्सीनचा तुतवडा असून, पुढील दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली होती. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.’महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट डीजीआयपीआरने 26 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय?’ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले – ‘केवळ तीन राज्यांनाच 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान. यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान. (राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार) लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसिकरणातील कामगिरीच्या आधारावर!’