नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दुपारी 12 वाजता नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकात मुस्लिमविरोधी असे काहीच नाही. मुस्लिम या देशाचे नागरिक होते आणि पुढेही राहतील असे अमित शहा म्हणाले. परंतु, त्यांनी विधेयकाची प्रस्तावना वाचली तेव्हाच विरोधकांनी गदारोळ निर्माण केला. काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूलसह सर्वच विरोधी पक्षांनी एकमुखाने या विधेयकाला विरोध केला. राज्यसभेत नागरिकत्व विधेयकावर रंगलेल्या चर्चेमध्ये एकानंतर एक सर्वांनीच लक्षवेधी भाषणे दिली. दरम्यान, शिवसेनेच्या आक्षेपावर बोलताना लोक सत्तेसाठी काय काय करतात असा टोला गृहमंत्र्यांनी लावला. एका रात्रीत शिवसेनेने या विधेयकावर भूमिका कशी काय बदलली हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगा असेही ते पुढे म्हणाले आहेत.
नेमके काय म्हणाले अमित शहा?
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबद्दल देशातील मुस्लिमांमध्ये गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे. मी त्यांना खात्री करून देऊ इच्छितो की ते भारतीय नागरिक आहेत आणि नेहमीच भारतीय राहतील. त्यांच्यावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा भारतीय मुस्लिमांशी संबंध कसा असू शकतो असा सवाल देखील अमित शहांनी केला. यानंतर विधेयकावर बोलताना, शेजारील देशांमध्ये धार्मिक आधारावर ज्यांना यातना दिल्या जात आहेत त्याच लोकांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. विरोधक यात मुस्लिमांसोबत भेदभाव होत आहे असे आरोप करत आहेत. पाकिस्तानातील मुस्लिमांना भारताचे नागरिकत्व कसे देता येईल अशा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे.
मोदींवर गांधीजी नाराज तर सरदार पटेल क्रोधित होतील -काँग्रेस
काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले, “आमच्या धर्मात आम्ही पुनरजन्मावर विश्वास ठेवतो. पुनरजन्म घेऊन आपण आपल्या पूर्वजांना भेटतो अशी आस्था आहे. अशात सरदार वल्लभभाई पटेल मोदींना भेटले तर ते निश्चितच क्रोधित होतील. महात्मा गांधी मोदींना भेटल्यावर दुखी होतील. परंतु, सरदार पटेल क्रोधितच होतील.” नागरिकत्व दुरुस्ती विधेयक महात्मा गांधींच्या चष्म्यातून पाहा. घाई करू नका असा सल्ला देखील शर्मा यांनी दिला.
तात्पुरत्या स्थगितीनंतर राज्यसभेचे कामकाज 12 वाजता पुन्हा सुरू करण्यात आले. लोकसभेत मंजुरीनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मांडले जात आहे. परंतु, दिवसाची सुरुवात होताच सभागृहात या मुद्द्यावर गदारोळ निर्माण झाला. विरोधी पक्षांचा आक्रोष पाहता राज्यसभा सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केले होते.
लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने 24 तासांत आपली भूमिका बदलली. आता या विधेयकावरून अनेक शंका आहेत. त्या दूर होत नाही तोपर्यंत राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देणार नाही. तसेच मानवतेला कोणताही धर्म नसतो असे शिवसेना खासदार संजय राउत यांनी सभागृहात जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणारा राजकीय पक्ष पाकिस्तानची भाषा करत आहेत असे टीकास्त्र पीएम मोदींनी सोडले आहेत.
इतरांना नागरिकत्व देण्यापेक्षा भारतीयांना मूलभूत सुविधा द्या -तृणमूल
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन म्हणाले, “तुम्ही देशातील लोकांना जेवण, कपडे आणि घरासारख्या मूलभूत सुविधा देऊ शकत नाही. त्यातच दुसऱ्या देशातील लोकांना नागरिकत्व आणि अधिकार देण्याच्या गोष्टी करत आहात. नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात व्यापक आंदोलन उठले आहे. तुम्ही जाहीरनाम्यात सुद्धा म्हणाला होता की कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. नोटबंदी, बेरोजगारी, गोरखा इत्यादी मुद्द्यांवर पंतप्रधानांचे दावे फौल ठरले. सरकार आश्वासने देण्यात चांगले पण ते पूर्ण करण्यात तेवढेच वाइट आहे. एनआरसीमध्ये बंगाली हिंदूंना नागरिकत्व देण्याचे खोटे आश्वासन देण्यात आले आहे. तुम्ही म्हणता, की नागरिकत्व विधेयक सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाईल. ही सुवर्ण अक्षरे राष्ट्रपिता महात्मा गांधी नाही तर मोहंमद जिन्ना यांच्या कब्रीवर लिहिली जातील.”