अमरावतीची जागा जिंकली असती तर समाधान मिळालं असतं. तिथं जे घडलं त्याचं दुःख असल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखवली. “नागपूर आणि पुण्यात बऱ्याच वर्षांपासून पदवीधर मतदारसंघांमध्ये एका पक्षाची मत्तेदारी होती. मात्र सुशिक्षित वर्ग देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झालं. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावं घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. मात्र हा निकाल म्हणजे त्या वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय हे या निकालांवरुन स्पष्ट झालं आहे,” असं अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवारांनी या निवडणुकीच्या माध्यमातून तिन्ही पक्षांनी एकत्र येत एक वेगळा राजकीय प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला याचा सामाधान असल्याची भावना व्यक्त केली. मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो. हा एक वेगळा प्रयोग शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंनी केला. त्याचं हे यश आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.