मुंबई- काँग्रेस पक्षाने नेहमीच दलित नेतृत्वाला उचित संधी दिली आहे आणि दलित समाजाच्या नेत्यांनीही काँग्रेससमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांवर मात करण्यात नेहमीच महत्वाची भूमिका वठवली आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेससमोर आता नवी आव्हाने उभी ठाकली असताना दलित समाजातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने या आव्हानांवर मात करण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करायला हवे असे आवाहन डॉ. राऊत यांनी दलित शोषितांचे नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागातर्फे आयोजित एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना केले.
“कॉंग्रेस पक्ष नेहमी दलित समाजाच्या पाठीमागे उभा राहिला आहे. दलित समाजाच्या उन्नतीसाठी नेहमी कॉंग्रेसने पुढाकार घेतला आहे. म्हणून दलित समाजही नेहमी कॉंग्रेससोबत आहे. बाबू जगजीवनराम यांचे जीवन चरित्र पाहता काँग्रेसने नेहमीच दलित नेतृत्वाला उत्तम संधी दिल्याचे दिसते. त्याचवेळेस हे ही दिसते की जेव्हा जेव्हा काँग्रेससमोर नवी आव्हाने, संकटे उभी राहिले तेव्हा तेव्हा दलित नेतृत्वामुळे या आव्हानांना काँग्रेस पुरून उरली आहे. आजही जेव्हा काँग्रेससमोर संविधानविरोधी, धर्मांध-जातीयवादी शक्तींविरूद्ध लढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. यावेळेस दलित समाजातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांने आपल्या प्राणाची बाजी लावून लढले पाहिजे,” असे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले.
बाबू जगजीवनराम यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात, कामगार, दलित, मागासांच्या कल्याणासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहितीही त्यांनी यावेळेस दिली. आपल्या तरूणपणी नागपूर येथे बाबू जगजीवनराम यांचे भाषण ऐकून मला नवी प्रेरणा मिळाली.
माजी खासदार पी एल पुनिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस उत्तर प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शाहनवाज आलम, अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव प्रदीप नरवाल, वरिष्ठ पत्रकार अनिल चमडीया उपस्थित होते.
“सतत रामाच नाव घेत सत्ताधारी भाजप पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारण करत आहे. प्रभू रामाच नाव घेऊन भाजपला जी राजकीय शक्ती मिळते, ती मागासवर्गीय दलितांविरोधात वापरली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लिम यांचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य केले. मात्र मग उत्तर प्रदेशात हिंदू असूनही दलितांशी गैरवर्तन भाजप सरकार का करीत आहे? मुलींवर बलात्कार का केले जात आहेत? दलित महिलांची हत्या का केली जात आहे?,” असा प्रश्नही त्यांनी संघपरिवाराला विचारला.
मागासांबद्दलची शास्त्रीय माहिती भाजपच्या सरकारने लपवल्याने स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण रद्द झाले, भाजपने पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आणि आता देशातील नोकरी शिक्षणातील आरक्षण संपवण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
आरक्षणमुक्त देशासाठी काँग्रेसमुक्तचा नारा
“ जेव्हा भाजप काँग्रेसमुक्त भारताचा नारा देतो, तेव्हा तो भारताला आरक्षणमुक्त करण्याच्या घोषणेचा नारा देते. कारण काँग्रेस पक्षानेच देशात आरक्षण दिले आणि त्याच्या संरक्षणासाठी राज्यघटनेत पहिली दुरुस्तीही केली. त्यामुळे काँग्रेस संपविल्याशिवाय आरक्षण संपवता येणार नाही, हे लक्षात आल्याने भाजप काँग्रेसमुक्त भारताचा नारा देत असते,” अशा शब्दात त्यांनी भाजपला धारेवर धरले.
राज्यघटना वाचली तरच दलित, बहुजन आणि अल्पसंख्याक समाज सुरक्षित राहिल आणि विकसित होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प केला पाहिजे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दलित, अल्पसंख्याक समाजावर अन्याय झाला तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे. जगजीवनरामजींना हीच खरी श्रद्धांजली ठरेल. बाबूजी यांनी दाखवलेल्या मार्गांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.