मीरा-भाईदर कार्यकर्ता मेळावा संपन्न
भाईंदर, दि. ९ मे – राज्यातील सत्तेसाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसशी संग केल्यामुळेच शिवसेनेला आता अयोध्येला जाण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शिवसैनिकांनी अयोध्येला जावे, अशी खोचक टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. भाजपच्या मीरा-भाईंदर जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात दरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या तडाखेबंद भाषणात दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नियोजनशून्य कारभाराचा समाचार घेतला. तसेच शिवसेनेच्या बेगडी हिंदुत्वावर जोरदार टीका केली.
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संगतीमुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल जनतेत संशय निर्माण झालाय. त्यामुळे असली-नकली अशा प्रकारची चर्चा आज सुरू आहे. राम मंदिरात जाऊन आम्ही हिंदुत्ववादीच आहोत, अशी भूमिका शिवसेनेला अधोरेखित करायची गरज असेल तर त्याचा आम्हाला आनंदच आहे, असा टोलाही दरेकर यांनी मारला.
आम्ही हिंदुत्ववादी भूमिका घेतोय हे त्यांना आता सांगावे लागत आहे, यातच सर्व काही आले. आदरणीय बाळासाहेबांना कधी हे सांगावे लागले नाही. जनतेनेच त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हटले. आता खरे हिंदुत्व, खोटे हिंदुत्व म्हणायची वेळ त्यांच्यावर का आली? याचा अर्थ तुम्ही हिंदुत्ववादी विचारधारा सोडून ज्यांनी कायम हिंदुत्वाला विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून केवळ सत्तेसाठी बसलेले आहात. त्यामुळे जनतेच्या मनात, विशेषतः हिंदू जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. त्यामुळे तुम्हाला हे सांगावे लागत आहे. तुम्हाला नकली हिंदुत्व, असली हिंदुत्व सांगत दवंडी पिटावी लागतेय. सभा घ्याव्या लागतायत, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
राणा दाम्पत्याची छळवणूक ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारने मांडलीय त्यातून स्वाभाविकपणे संताप व्यक्त होत आहे. तुम्ही त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा टाकलाय आणि न्यायालय सांगतेय की त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा होऊ शकत नाही याचा अर्थ तुम्ही चुकीचे केले होते, असे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, जर चुकीचे केले असे सरकारला वाटत असेल तर राणा दांम्पत्यांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही या आपण जनतेच्या दरबारात जाऊ. आमच्यासमोर निवडणुकीला उभे राहा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. राणा दाम्पत्य लढवय्ये असे दाम्पत्य आहे. त्यांनी तशा प्रकारचे आव्हान दिले आहे. ते मुख्यमंत्र्यांनी स्वीकारायचे की काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
मीरा-भाईंदरमध्ये भाजपचेच राज्य असेल
भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते ज्या ताकदीने पार्टीचा झेंडा घेऊन सामील आहेत ते पाहून भाजपला हलवण्याची ताकद कोणातच नाही, नजीकच्या काळात मीरा-भाईंदरमध्ये भाजपचेच राज्य असेल, असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.
संघटन ही भाजपची खूप मोठी ताकद आहे. इतर सर्व पक्षांमध्ये परिवाराचा राजकीय वारसा असतो. शिवसेना म्हटले की, ठाकरे परिवाराचा पक्ष, राष्ट्रवादी म्हटले की शरद पवार यांचा पक्ष. कॉँग्रेस म्हटले की, सोनिया गांधींचा, राहुल गांधी यांचा पक्ष. पण भाजपा म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजप पक्ष असा आहे ज्याचा अध्यक्ष कोण असेल हे कोणीही सांगू शकत नाही. भाजपमधील निर्णय सामुदायिक रीतीने होतो, असे दरेकर यांनी सांगितले.
गटबाजीला थारा नाही
भाजपमध्ये कधीही गटबाजी चालत नाही. भाजपमध्ये दोन-तीन गट असे राजकारण कधीच नव्हते. भाजपमध्ये फक्त एकच गट आहे तो म्हणजे फक्त भाजपचाच आहे. कोणामध्ये काही मतभेद असतील तर ते चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा नक्की प्रयत्न करण्यात येईल. भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे, त्यामुळे पक्ष हा त्या ध्येयधोरणानुसारच चालेल, कोणा व्यक्तीनुसार पक्ष चालणार नाही. पक्षामध्ये त्या जिल्ह्याचा प्रमुख हा पक्षाचा असतो, त्यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय होत असतो, त्यामुळे जर कोणाला वाटत असेल की पक्ष आपल्या मर्जीनुसार चालावा तर तसे येथे होणार नाही. भाजपच्या येथील जिल्हा संघटन व पक्ष बांधणीची जबाबदारी आपल्याला सोपविल्यानंतर पक्षातील सर्व स्तरावरील घटकांशी सविस्तर चर्चा करण्यात येईल. पक्षाने ज्यांच्यावर विश्वास टाकला आहे त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळेच पक्षात सर्व जण मिळूनमिसळून काम करतील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महापौर ज्योत्स्ना हस्नाले, ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास काका पाटील, भाजप नेते हेमंत म्हात्रे, भाजपा सचिव ॲड अखिलेश चौबे, जिल्हा अध्यक्ष रवी व्यास, प्रदेश पदाधिकारी दिपाली मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना मीरा-भाईंदर जिल्ह्याच्या भाजपच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मीरा-भाईंदर मधील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पडला. दरेकर यांच्या स्वागतासाठी येथील भाजपच्या कार्यकर्त्यानी बाईक रॅली काढली होती. तसेच मीरा-भाईंदर मधील नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला कार्यकर्ता- पदाधिकारी तसेच भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांच्याशी वैयक्तीक संवाद साधला. पक्ष संघटनाच्या दृष्टीने त्यांच्यासमवेत चर्चा केली.