मुंबई, दि. १० मार्च – महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर जात असून वाढत्या कोरोना रुग्णांचा प्रचंड ताण आरोग्य प्रशासनावर पडत आहे. दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्णांची हेळसांड सुरू असून राज्य सरकार मात्र विरोधी पक्षात असल्यासारखे वागत आहे, राजकीय वक्तव्ये, कृती आणि आरोप करण्यात वेळ घालवत आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वाढणाऱ्या रुग्णांना लसीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. अधिक लसींचे डोस आले पाहिजेत. पण त्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. त्यादृष्टीने आमचाही केंद्राकडे पाठपुरावा आहे. परंतु, राज्यात एकही लस शिल्लक नाही, अशा प्रकारचं चित्र खुद्द राज्य सरकारकडून उभं केलं जातं असून लसी संपल्याचा खोटा कांगावा केला जात असल्याचा आरोप दरेकर यांनी केला .
दरेकर म्हणाले की, पुण्यात एका लसीकरण केंद्रात ७८ हजार डोस उपलब्ध असल्याची माहिती बाहेर आली. मात्र, लस शिल्लक नाही असा कांगावा करून कोरोनासारख्या संकटकाळात सुद्धा राज्य सरकारला राजकारण करायचं आहे का, यामागे सरकारचा काय उद्देश आहे, असा सवाल करून ते म्हणाले की, स्वतः राजकारण करत असताना विरोधकांना राजकारण करू नका, असं आवाहन जर सरकार करत असेल तर सरकारने या दुट्टपी भूमिकेतून बाहेर आलं पाहिजे तरच कोरोनाला थोपवण्याचं नियोजन सरकारकडून होऊ शकेल आणि गतीने उपाययोजना होतील, असा सल्लाही दरेकर यांनी सरकारला दिला आहे.
लसीबाबत आखण्यात आलेला प्रोटोकॉल तोडून ग्लोबल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची बाब भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उघड केली आहे. तीन ते चार लाख डोस वाया गेले आहेत. त्या डोसबद्दल नेमकं काय झालं, चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर झाला का, याचंही स्पष्टीकरण सरकारकडून आलं पाहिजे, अशी मागणी करताना दरेकर यांनी आरोग्य यंत्रणेवर सरकारचं कोणतंही लक्ष नाही, नियंत्रण नाही. ज्यांना लसीची आवश्यकता आहे त्यांना लस उपलब्ध करून दिली जात नाही, एकूणच आरोग्य व्यवस्थेची हेळसांड या सरकारकडून झाली आहे, असा आरोप केला.
गेल्या वर्षभराच्या काळात राज्य सरकार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून आजही बेडस, वेंटीलेटऱ् ऑक्सिजनयुक्त व आयसीयू बेड्स उपलब्ध नाहीत, रेमडीसिवीरचा तुटवडा आहे, काळा बाजार होतो आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत काळाबाजार सुरू असून, नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळ पुन्हा चव्हाट्यावर आला असल्याचे दरेकर यांनी सांगितले. नाशिकमधील कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाला बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकले गेले असून नाशिक, सोलापूर येथे याच तुटवड्याबाबत आंदोलन सुरू आहे, अंधेरी येथे काळाबाजार करताना दोन जणांना पकडलं गेलं आहे. सरकार मात्र केवळ रेमडीसीवीरवर नियंत्रण आणू, कारवाई करू, अशी वक्तव्ये करीत आहे. सरकारने केवळ बोलण्यापेक्षा कृती करण्याची आवश्यकता आहे. राज्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप करण्याचा मास्टर प्लॅन सरकार राबवत आहे, आपलं अपयश केंद्रावर झटकून जबाबदरीपासून दूर जाण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
प्रत्येक वेळेस आयत्या वेळी विहीर खोदण्याचं काम सरकार करत असून राज्यात रक्ताचा साठा ५ दिवस पुरेल एवढाच शिल्लक असताना या सरकारला जाग आली. भाजपने अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं भरवून रक्त जमा करण्याचा प्रयत्न केला असताना सरकार झोपेत असून कोणतीही उपाययोजना करण्याऐवजी भाजप राजकारण करीत असल्याचा आरोप सरकारकडून केला जात आहे, अशी व्यथा दरेकर यांनी मांडली.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा गोंधळ सुरू असून आज नागपुरात कोविड सेंटरवर आग लागली, 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. भंडारा येथे आगीचे प्रकरण झाले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, आम्ही काळजी घेऊ, फायर ऑडिट करू. परंतु, त्यानंतर अनेक रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटना घडल्या असल्याबद्दल आणि सरकार गंभीर नसल्याबद्दल दरेकरांनी सरकारवर निशाणा साधला आहे.