नवी दिल्ली- संसदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात संसदेच्या आवारात खटके उडाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला तेव्हा सोनिया स्मृतींना म्हणाल्या- डोंट टॉक टू मी. तर सोनियांनी भाजपच्या महिला खासदारांना धमकावल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.
सोनिया गांधी संसदेच्या संकुलात असताना भाजपच्या महिला खासदारांनी त्यांना थांबवून बोलायला सुरुवात केली. खासदार रमा देवी सोनियांना म्हणाल्या- तुमचे खासदार अधीर रंजन राष्ट्रपतींबद्दल कसे वक्तव्य करत आहेत? यावर सोनिया म्हणाल्या- अधीर रंजन यांनी माफी मागितली आहे, पण या प्रकरणात माझे नाव का घेण्यात आले?
यावर तिथे उपस्थित असलेल्या स्मृती इराणी म्हणाल्या- मॅडम मी तुमची मदत करू शकते, मी तुमचे नाव घेतले होते. यावर सोनिया म्हणाल्या- डोंट टॉक टू मी. यानंतर दोघींमध्ये तू-तू, मैं-मैं सुरू झाली. वाद वाढत असल्याचे पाहून सोनिया तिथून निघून गेल्या. त्या गेल्यानंतर भाजपच्या महिला खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
सोनियांनी भाजपच्या महिला खासदारांना धमकावल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, सोनियांनी स्मृती आणि इतर भाजप खासदारांसोबत गैरवर्तन केले आहे.
यामुळे संतापल्या सोनिया
काँग्रेसचे लोकसभा खासदार अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी संसदेच्या संकुलात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपत्नी संबोधले. त्यावरून भाजपच्या महिला खासदारांनी गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले. सभागृहात स्मृती यांनी अधीर रंजन यांच्या वक्तव्यासाठी काँग्रेसला दोषी ठरवले आणि सोनिया गांधींना माफी मागण्यास सांगितले.स्मृती इराणी इथेच थांबल्या नाहीत. संसदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की- अधीर रंजन त्यांच्या वक्तव्यावर माफी मागत नाहीत कारण त्यांच्या विधानाला सोनियांची संमती आहे. स्मृती यांनी लोकसभेत ज्या पद्धतीने सोनियांवर थेट हल्ला चढवला आणि नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडीकडून तीन दिवस चौकशी करण्यात आली, त्यामुळे सोनिया संतापल्या आहेत.
गदारोळ का झाला?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्याने संसदेत मोठा गदारोळ झाला. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी दिल्लीत पक्षाच्या निदर्शनादरम्यान राष्ट्रपतींसाठी हा शब्द वापरला होता. भाजपने आता हा मुद्दा बनवला आहे. संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसने यासाठी देशाची माफी मागावी, असे स्मृती इराणी म्हणाल्या.