पुणे- ये खिदमतगारोंका घर बने .. अशी अपेक्षा व्यक्त करीत महात्मा गांधी च्या पुनुत स्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कॉंग्रेस भवन वर हल्ला करून दहशत माजविणाऱ्या टोळक्याची अवघ्या एका दिवसात जामिनावर सुटका झाली आहे.कदाचित या हल्ल्यामागचा मास्टर माइंड कोण ? हल्लेखोरांनी हातात आणलेली लाठ्या काठ्या कुठून आणली ते कोणत्या वाहनाने आले ,त्यांचा हल्ल्यामागचा हेतू काय होता ? या व इत्यादी सर्व प्रकरणाचा इथंभूत तपास अवघ्या एका दिवसात पोलिसांनी पूर्ण केला असावा त्यामुळे कदाचित आरोपींची जामिनावर सुटका झाली असावी असा टोला मारला जातोय .
दरम्यान दुसरीकडे ‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केलेले कार्यकर्ते माझे नाहीत,’ असा खुलासा करून भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी घडलेल्या तोडफोडीच्या घटनेशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले. विरोधी पक्षांनी मला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य केल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, काँग्रेस भवनात आलेल्या थोपटे यांच्याशी शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधला नाही. त्यामुळे अवघ्या काही वेळातच थोपटेंची औपचारिक भेट आटोपली.थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने चिडलेल्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी काँग्रेस भवनच्या इमारतीवर तुफान दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले होते. तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांनी थोपटे यांच्या नावाने घोषणा दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर थोपटे बुधवारी सायंकाळी काँग्रेस भवनात तोडफोडीची पाहणी करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आले होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. अभय छाजेड वगळता शहरातील इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी बोलणे टाळले. थोपटे यांनी तोडफोड झालेल्या इमारतीची पाहणी केली आणि त्यानंतर ते तेथून जवळील एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसमवेत चहापाण्यासाठी निघून गेले.थोपटे काँग्रेस कार्यालयाची पाहणी करत असताना तेथील मैदानात शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे चिरंजीव नगरसेवक अविनाश बागवे, विरेंद्र किराड, पृथ्वीराज पाटील, संगीता तिवारी, रमेश अय्यर, सचिन अडेकर, अजित दरेकर, कैलास कदम, सुमीत डांगी, विठ्ठल थोरात, सचिन सावंत, द. स. पोळेकर, प्रकाश पवार आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी थोपटे यांच्याशी बोलणे टाळले. थोपटे यांनीही त्यांच्याजवळ न जाता तेथून निघून जाणे पसंत केले. या प्रकारानंतर काँग्रेस भवनात असलेला तणाव ओळखून साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर १९९९मंध्ये शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयाची इमारत ताब्यात घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी तयारी केली होती. त्या वेळी ही इमारत वाचविण्यात माझे वडील अनंतराव थोपटे यांचा महत्त्वाचा वाटा होता. नाही तर, ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी त्या वेळीच या इमारतीचा ताबा घेतला असता.त्यामुळे या इमारतीचे आणि माझे विशेष ऋणानुबंध आहेत,’ असे आमदार संग्राम थोपटे म्हणाले. काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करणारे कार्यकर्ते आपले नाहीत. माझे वडील काँग्रेसचे ४० वर्षे निष्ठावान कार्यकर्ते असून, मीसुद्धा तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. मंत्रिपद न देण्याचा पक्षश्रेष्ठींचा आदेश असून, तो पाळणारा मी कार्यकर्ता आहे. असे थोपटे यांनी म्हटले आहे.
४० वर्षे थोपटेंनी कॉंग्रेसची सेवा केली कि कॉंग्रेसने थोपटे घराण्याची सेवा केली ?
दरम्यान थोपटे यांचे दावे आणि विधाने हास्यास्पद असून कॉंग्रेस भवन ची इमारत हि कोणाही एका नेत्याच्या ताब्यात राहत नाही ती पक्षाची इमारत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव असल्याचा प्रतिआरोप होतो आहे . ४० वर्षे थोपटे यांनी कॉंग्रेसची सेवा केली कि कॉंग्रेस णे थोपटे घराण्याची सेवा केली असा प्रतिप्रश्न देखील पुण्यातून विचारला जातोय . ऐतिहासिक कॉंग्रेस भवनवर हल्ला करणे म्हणजे दहशत पसरविणे होय आणि ती हि मंत्रिपदासाठी पसरविली जात असेल तर पोलिसांनी याबाबत मोका का लावला नाही असा प्रश्न हि उपस्थित होतो आहे.